करोना महामारीच्या संकटामुळे देशभरात पुन्हा लॉकडाउन लागू होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये २५ सप्टेंबरपासून केंद्र सरकार देशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नियोजन आयोगाने केंद्र सरकारला २५ सप्टेंबरपासून ४६ दिवसांपर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची विनंती केली आहे, त्यानुसार २५ सप्टेंबरपासून केंद्र सरकार देशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करणार असल्याचं व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. हा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल झाला असून याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाला (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक :-
पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.

काय आहे सत्य ?-
केंद्र सरकार देशभरात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाउन जारी करणार असल्याचा व्हायरल मेसेज खोटा असून, अशाप्रकारचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही असं, ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने स्पष्ट केलं आहे.


याशिवाय, ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने लोकांना अशाप्रकारच्या खोट्या व फेक बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे.