Indrayani River Bridge : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळण्याची मोठी दुर्घटना नुकतीच घडली आहे. रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आले.

कुंडमळा का ठरत होता पर्यटकांचे आकर्षण ?

मावळमधील कुंडमळा हे पुण्याजवळील सर्वात सुंदर पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे. कुंडमळा येथील पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी, नदीच्या मध्यभागी वसलेले सुंदर मंदिर, नदीवरील छोटसे धरण, खडकावरून वाहणारे शुभ्र पाणी, नदीवर असलेला छोटासा पूल अन् हिरवागार परिसर हे निसर्गरम्य दृश्य मनाला मोहून टाकते. या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने भेट कुंडमळ्याला देतात.

नदीच्या मध्यभागी असलेले हे प्रसिद्ध मंदिर हे कुंडराई माता मंदिर म्हणून ओळखले जात. खरं तर, स्थानिक आणि जवळच्या ग्रामस्थांसाठी हे कुलदेवीचे मंदिर आहे. नदीवर एक लहान धरण देखील बांधले आहे, जे पावसाळ्यात इंद्रायणी नदीचे ओसंडून वाहणारे पाणी साठवते.

पुणे शहरापासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेले हे ठिकाण पुण्याजवळ भटकंती करू इच्छिणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. तळेगाव दाभाडे जवळील हे ठिकाण पुणे शहरापासून फक्त ३० किमी अंतरावर असल्याने पर्यटकांच्या दृष्टीने एक उत्तम ठिकाण आहे. बेगडेवाडी रेल्वे स्थानकापासून फक्त १ किमी अंतरावर आहे आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गापासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे. त्यामुळे शनिवार -रविवारच्या सुट्टी दिवशी पुणेकरांना सहज भेट देता येईल असे ठिकाण असल्याने ते नेहमीच पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.

हे ठिकाण शांत आणि फारसे माहित नसलेल्या ठिकाणांपैकी एक होते. पण जेव्हापासून इंस्टाग्रामवर या ठिकाणांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर येथे भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दुर्घटनेनंतर कुंडमळाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूल का कोसळला?

दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रविवार, सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या भागात आले होते. पर्यटकांची संख्या पुलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळल्याच बोललं जात आहे. या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी यांनी एएनआयशी बोलताना पूल का कोसळला याबाबत सांगितले की,”मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पुल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता. आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांसह गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळला. एकाचवेळी १०० ते १५० लोक एकत्र जमा झाल्यामुळे हा पुल कोसळला आहे.”