भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्या सह विज व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची पातळी देखील भरपूर प्रमाणात वाढळी आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस व आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकामुळे पुर परिस्थिती लक्षात घेता द्वारे असणारे मोठे धरणाचे वक्रव्दार (गेट) केव्हाही  उघडण्यात  येवू  शकतात. धरणातील पाणी साठा १०० %  पेक्षा जास्त झाल्यावर नदि/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार असल्याने नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना व  नदी  पात्रातून आवागमण करणा-या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी..

-भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरण बाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेऊन सतर्क रहावे.

– कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका

– नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा

– मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.

– जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.

–  नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

– अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

– धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

–  घडलेल्या घटनेची / आपत्ती ची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी

नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.