वसई : मुंबई, ठाण्या पाठोपाठ आता वसई विरार शहरात ही करोनाचा शिरकाव झाला आहे. शुक्रवारी वसईच्या खोचिवडे येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. या व्यक्तीवर माहीम येथील एस एल रहेजा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
मुंबई- ठाण्या प्रमाणेच वसई विरार भागात करोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. वसई विरार शहरात ही करोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील एव्हर शाईन भागात एक रुग्ण आढळून आला होता. मात्र त्या रुग्णाची करोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यातून तो बरा झाला होता. त्यापाठोपाठ आता वसई ग्रामीण मध्ये मोडणाऱ्या नायगाव खोचिवडे येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. शुक्रवारी सकाळी तातडीने माहीम येथील रहेजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शुक्रवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. वसई विरार मधील करोनाचा आजारामुळे पहिला रुग्ण दगावला आहे. हा रुग्ण वसई ग्रामीण मध्ये येत आहे.
या रुग्णावर माहीम येथे उपचार सुरू होते. त्याची करोनामुळे मृत्यू झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे वसई तालुका वैद्यकीय अधिकारी ऋग्वेद दुधाट यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही विशेष लक्ष केंद्रित करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.नागरिकांनी सुद्धा करोनाच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करवून घ्या असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
चाचण्यावर भर दिला जाणार
ग्रामीण भागात सद्यस्थितीत पहिला रुग्ण करोनाचा आढळून आला होता. करोना नियंत्रणाच्या दृष्टीने नुकताच राज्य शासनाच्या आरोग्य विभागासोबत बैठक पार पडली आहे. त्यात करोना चाचण्या यासह अलगीकरण व विलगीकरण कक्ष उभारणे व औषध साठा उपलब्ध करणे अशा सर्व सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय सोमवारी करोना चाचणी संच ही उपलब्ध होतील तेव्हा करोना चाचण्यावर भर दिला जाईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी ऋग्वेद दुधाट यांनी सांगितले आहे.