भाईंदर : आगमी पालिका निवडणुकीच्या दुष्टीने खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच संधी देण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. मीरा भाईंदर भाजप पक्षातील गटातटाचे राजकारण शिगेला पोहचू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी रविवारी मीरा भाईंदर शहराचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रथमच पालिका निवडणुकीबाबत पक्षाची  भूमिका स्पष्ट केली. यात मीरा भाईंदर भाजपमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष  रवी व्यास या दोघांमधील  वाद शिगेला पोहचू लागला असल्यामुळे  थेट दोन गट तयार झाले असल्याचा प्रश्न  पत्रकारांनी उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणारा तसेच पक्ष आदेशानुसार वागणाऱ्या व्यक्तीलाच महत्त्व दिले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. याशिवाय आगामी पालिका निवडणुकीसाठी खासगी संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार असून त्यात जनतेत प्रसिद्ध असलेल्या उमेदवारालाच थेट प्रदेश कार्यलयातून निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार असल्याची  घोषणा त्यांनी केली. यामुळे आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद मेहता आणि जिल्हाध्यक्ष रवी व्यास महत्त्व कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.