भाईंदर:मिरा-भाईंदर शहरातले नागरिक ध्वनी आणि जलप्रदूषणाच्या चकाट्यात अडकत चालले आहेत.तब्बल एकवर्षे जुना पर्यावरण अहवाल महापालिकेने प्रसिद्ध केल्यानंतर बाब उघडकीस आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मिरा भाईंदर शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन व जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे.त्यामुळे दरवर्षी महापालिकेकडून पर्यावरण अहवाल तयार केला जातो.साधारण ३१ जुलै पूर्वी हा अहवाल प्रसिद्ध करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत.मात्र मागील दोन वर्षांपासून हा अहवाल प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत नव्हता.
दरम्यान गुरुवारी पर्यावरण दिनाचे औचित साधून महापालिकेने एक वर्ष जुना (२०२३-२४) पर्यावरण अहवाल अखेर प्रसिद्ध केला आहे.यामध्ये शहरातील ध्वनी व जल प्रदूषणाने काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे समोर आले आहे.तर हवा प्रदूषणात वाढ होत असली तरी हे प्रदूषण ‘समाधानकारक’ पातळीच्या वर जात नसल्याचे म्हटले आहे.तर वाढत्या शहरीकरणामुळे जैवविविधता धोक्यात आली स्पष्ट करण्यात आले आहे.
ध्वनी प्रदूषणात वाढ
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील १३ ठिकाणी ध्वनी पातळीचे सर्वेक्षण केले असून, यामधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, काशी-मीरा चौक व मीरा रोड रेल्वेस्थानक परिसरात अनुक्रमे ७३.४ डेसिबल आणि ९४.६ डेसिबल इतकी उच्च ध्वनिपातळी नोंदवण्यात आली आहे. ही पातळी ठरवलेल्या ६५ डेसिबल मर्यादेपेक्षा खूपच अधिक आहे.त्याचप्रमाणे, घोडबंदरमधील फाउंटन हॉटेल परिसरात ७२.३ डेसिबल, तर भाईंदर पूर्वेतील केबिन रोड भागात ६९.८ डेसिबल इतकी ध्वनिपातळी असल्याचे आढळले आहे. फक्त उत्तन नाका आणि पाली चर्च या दोन ठिकाणीच ध्वनी मर्यादेच्या आत पातळी असल्याची नोंद आहे.मात्र सण-उत्सवांच्या काळात ही स्थिती आणखी गंभीर होत असल्याचा देखील उल्लेख अहवालावत करण्यात आला आहे.
जल प्रदूषण ही नियंत्रणाबाहेर
शहरातील जलस्रोतांच्या बाबतीतही चित्र चिंताजनक आहे. घोडबंदर, रेती बंदर खाडी, भाईंदर पश्चिम धक्का आणि घोडबंदर स्मशानभूमी नदी हे जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. यामध्ये जैविक आणि रासायनिक प्रदूषकांचे प्रमाण अधिक असून, त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर घट झाली आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळात मूर्ती विसर्जनानंतर जलप्रदूषणात अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या खाड्यांचे पाणी थेट अरबी समुद्रात मिसळत असल्यामुळे प्रदूषणाचा व्यापक परिणाम किनारपट्टी परिसरातही जाणवत आहे.
विलंबाने प्रसिद्ध केलेला अहवाल
हा पर्यावरण अहवाल २०२३–२४ या आर्थिक वर्षासाठीचा असून, त्याच्या प्रसिद्धीत तब्बल एक वर्षाचा विलंब झाल्याची नोंद आहे. प्रदूषणाची स्थिती भीषण असताना महापालिकेला गांभीर्य नसल्याचे आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले आहेत.
जैवविविधता धोक्यात
मिरा भाईंदर परिसरात शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जैवविविधतेवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. खाड्यांमधील अतिक्रमण, अनियंत्रित विकास, प्लास्टिकचा वापर, जलप्रदूषण आणि सांडपाण्याचा निचरा यामुळे खारफुटी क्षेत्रांचा ऱ्हास होऊन जलजीव आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासन, पर्यावरणसंरक्षक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येऊन खाड्यांचे संरक्षण
करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.