वसई: राज्याच्या विविध ठिकाणच्या भागात रुग्ण आढळून येत असतानाच आता वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आतापर्यंत शहरात ६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या बाधितांची लक्षणे सौम्य स्वरूपाचे असून ते घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून मुंबई- ठाणे व राज्याच्या अन्य भागात करोना रुग्ण आढळून येत होते. त्यापाठोपाठ आता वसई विरार शहरातही करोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे.
आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाने ६ हजार ९७३ इतक्या जणांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यातून २२५ जणांच्या करोना चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये ६ रुग्णांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. यात एक करोना रुग्ण बरा झाला असून अन्य पाच जणांवर घरीच अलगीकरण करून उपचार सुरू आहेत. त्या रुग्णांच्या प्रकृतीवर ही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून लक्ष दिले जात आहे.
आढळून आलेल्या करोनाबाधितांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. असे जरी असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ही महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.यापूर्वी वसई ग्रामिण भागात ही एका ४३ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने वसई विरार भागात ही चिंता वाढू लागली आहे.
महापालिका सज्ज
करोना आजाराचा धोका लक्षात घेता वसई विरार महापालिका सज्ज झाली आहे. शहरात पालिकेने उपचारासाठी ७५ खाटा व अन्य खासगी रुग्णालयातील ७२५ खाटा राखीव ठेवल्या आहेत.यात २२५ आयसीयू खाटा, १३१ व्हेंटिलेटर खाटा, ३४३ ऑक्सिजन खाटा याशिवाय रुग्णांना गरज पडल्यास रेमडिसिव्हर ही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. याशिवाय ७८ मॅट्रिक टन पेक्षा जास्त प्राणवायू साठा ही उपलब्ध करून ठेवला आहे. करोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सुद्धा गर्दीत जाणे टाळावे, आवश्यक ती काळजी घ्यावी व ज्यांना करोना सदृश्य लक्षणे दिसून येतील त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करा असे आवाहन महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.