वसई: वसई विरार मध्ये पाकिस्तान पाठोपाठ आता नेपाळ येथील सीमेलगत भागातूनही अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नुकताच वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून ३७ लाख ५१ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

 ८ ऑक्टोबरला वसई पूर्वेकडील खैरपाडा येथे एक इसम राहत्या घरातुन चरस अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी पथक तयार करून छापा टाकून इरफान सुलेमान खत्री (७०) याला ताब्यात घेतले त्याच्याकडे १ किलो ८८ ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १६ लाख ३७ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर ही पोलिसांचा तपास सुरू होता.

याच दरम्यान मुख्य आरोपी तबरेज अमीन मियान खान (२५) याला ही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ हजार ३८६ ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ व १ हजार ५० ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल असा मुदेमाल जप्त केला. दोन्ही आरोपीताकडुन ३७ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट) कलम ८ (क), २०(ब), ए (क), २९, ८ (क), २०(ब), (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अशी केली जात होती तस्करी

अटक करण्यात आलेला तबरेज खान हा मूळचा बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील आमदोई या गावातील आहे. नेपाळ ची सीमा त्याच्या गावापासून अगदी काही अंतरावर आहे. तेथील ओळखीच्या तस्करांच्या माध्यमातून नेपाळ मध्ये जाऊन चरस आणि गांजा खरेदी करत होता. व त्यानंतर कपड्याच्या बॅगेत भरून रेल्वे मार्गाने भिवंडीत घेऊन येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरक्षनाथ जैद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, फौजदार शैलेश पाटील, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, आनंद मोरे, बाळु कुटे, विनायक राऊत, अनिकेत पाटील, सचिन लांडगे, केतन गोडसे, नागनाथ केंद्रे यांनी केली आहे