वसई : बोगस अस्थिरोगतज्ञ म्हणून वावरणार्‍या तोतया डॉक्टर हेमंत पाटील याने केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे वसईतील सामाजिक कार्यकर्त्या माया केनिया (६०) यांचे निधन झाले आहे. या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना अपंगत्व आले होते तसेच शरीरात अनेक व्याधी निर्माण झाल्या होत्या. बोगस डॉक्टरने माझ्या पत्नीचा जीव घेतल्याचा आरोप केनिया यांच्या पतीने केला आहे.

मसाला विक्री करणारा हेमंत पाटील नावाचा एक तोतया डॉक्टर वसईत अस्थिरोगतज्ञ म्हणून कार्यरत होता. फेब्रुवारी २०२० त्याने वसईच्या साईनगर येथे राहणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या माया केनिया (६०) यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यासाठी अडीच लाख रुपये घेतले होते. ती शस्त्रक्रिया चुकीची झाल्याने माया केनिया यांना अपंगत्व आले आणि यांच्या शरिरात विविध व्याधी निर्माण झाल्या होत्या. या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे केनिया ४ वर्षांपासून त्या अंथरुणातच होत्या. शुक्रवारी त्यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा…वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

बोगस डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे माझ्या पत्नीचे आयुष्य उध्वस्त झाले होते. बोगस डॉक्टरनेच माझ्या बायकोचा जीव घेतला असा आरोप मयत माया केनिया यांचे पती महेंद्र केनिया यांनी केला आहे. माया केनिया या वसईतील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अनेक वर्षे त्या शिवसेनेत सक्रीय होत्या तसेच महिला दक्षता समितीमध्ये कार्यरत होत्या. बोगस डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच केनिया यांचा मृत्यू झाला आहे अशा शब्दात शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी आपला संताप व्यक्त केला. पालिकेने शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा असे बळी जात राहतील असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…वसई : शहराची नव्याने रचना करताना..

कोण आहे तोतया हेमंत पाटील?

हेमंत पाटील उर्फ सोनावणे याने बडोदा विद्यापीठाची बनावट एमबीबीएस आणि एमस (सर्जन) म्हणजे अस्थिरोगतज्ञाची पदवी तयार केली होती. त्याच्यावर यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर प्रकरणात गुन्हा दाखल होता. वसईतही त्याने अस्थिरोगतज्ञ म्हणून दवाखाना सुरू केला. त्याने केलेल्या शस्रक्रियेमुळे ९ जणांना अपंगत्व आले आहे. त्याचे प्रकरण लोकसत्ताने २०२२ मध्ये उघडकीस आणले होते. त्याच्यावर फसवणूक, हत्येचा प्रयत्न तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय त्याने वेगवेगळ्या महिलांना फसवून ५ लग्न केल्याचा आरोप आहे. त्याने मिरा भाईंदर महापालिकेची देखील फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया केनिया यांच्याप्रमाणेच हेमंत पाटील याने ९ जणांवर चुकीच्या शस्त्रक्रिया केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. चुकीची इंजक्शने देऊन, जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने त्याच्यावर वसई पोलिसांनी ३०७ अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला होती. सध्या हा तोतया जामिनावर सुटला आहे.