भाईंदर: मिरा रोड येथे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या झोपड्यांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे दोन ते तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिरा रोड येथील शीतल नगर परिसरात एका विकासकाची मोकळी जागा आहे. या जागेत विकासकाने आपल्या कामगारांसाठी सुमारे वीस ते पंचवीस पत्र्याच्या झोपड्या उभारल्या होत्या. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास यातील एका झोपडीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यावेळी या झोपड्यांमध्ये दोन-तीन मजूर उपस्थित होते.

भर दुपारी लागलेल्या आगीने झपाट्याने पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे झोपड्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन ते तीन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सुमारे तासाभरात आग नियंत्रणात आणली. मात्र या लागलेल्या आगीत आठ ते दहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र शहरात झोपड्यांना लागणाऱ्या आगी व त्यामुळे होणाऱ्या सिलेंडर स्फोटांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच आग रामदेव पार्क येथील नव्या गृहनिर्माण संस्थेच्या बांधकाम स्थळी लागली होती. तर दीड वर्षांपूर्वी आगीत झालेल्या सिलेंडर स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.