वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरूनच अमली पदार्थांची पाळेमुळे अगदी खोलवर रुजत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने या अमली पदार्थाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक जण निवाऱ्यासाठी दाखल होत आहेत.

शहरात उभी राहणारी अनधिकृत झोपड्या या सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा निवारा असला तरी दुसरीकडे याच अनधिकृत झोपड्यांचा व इमारतींचा आसरा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं ही यात आश्रयाला येत आहेत. विशेषतः विदेशी नागरिक ही शहरात दाखल होत आहे. आणि याच विदेशी नागरिकांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेषतः नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे.सर्वाधिक गुन्हे याच भागात घडत असल्याचे अनेकदा पोलीस कारवायामधून समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून नालासोपारा भागातून अमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या मोठं मोठ्या घटना उघड झाल्या आहेत. चक्क नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना घरातच चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

एक नायजेरियन महिला तिच्या साथीदाराच्या साहाय्याने घरातच एमडी नावाचा अमली पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा दिवसात सुमारे १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ या भागातून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे वसई विरार आणि मिरा भाईंदर शहराला अमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारांवर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा यांच्या मार्फत कारवाई केली जाते.

मागील दोन वर्षात सुमारे दीड हजाराहून अधिक अमली पदार्थ विरोधी कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. यावरूनच दोन्ही शहरात अमली पदार्थाचा वापर याची व्यापकता लक्षात येते. दुसरीकडे सततच्या कारवायामुळे ही या अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः अमली पदार्थामध्ये अफू, गांजा, कोकेन, एमडी ( मेफेड्रोन) अशा अमली पदार्थ आढळून येत असून त्याच्या कोट्यवधी रुपयांचा घरात रक्कमा आहेत.

शहरातील काही भाग आता अमली पदार्थांची केंद्र बनू लागली आहेत. यात तुळींज, संतोष भुवन, प्रगतीनगर अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी, शिर्डीनगर. बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर अशी प्रामुख्याने ठिकाणे आहेत.अशा ठिकाणांना आता लक्ष्य करण्याची वेळ आली आहे. छुप्या मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा ही छुपा पाठींबा असल्याचे मध्यंतरी उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांचा सहभाग हा देखील एकप्रकारे चिंतेचा विषय आहे.अशा प्रकारे जर पोलीस यंत्रणा छुपा पाठींबा देत असेल तर अमली पदार्थ विक्रेत्यांची चलती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग….

वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवाया मध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान दिसून पोलिसांना आले आहे. अनेक अमली पदार्थांच्या कारवाया मध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात तीनही आरोपी नायजेरियन असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात ही पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.मध्यंतरी त्यांच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी भाड्याने भर देताना आणि बेकायदा वास्तव्य असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकाने पोलिस ठाण्यात देणे पोलिसांनी बंधनकारक केले होते.मात्र त्यानंतर ही अनेक परदेशी नागरिक विना परवाना शहरात राहत आहेत.

अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालायचा असेल तर आधी त्याचे मुळ शोधून काढून त्यावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून अनेक बेकायदेशीर पणे राहणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुन्हा एकदा तशीच मोहीम राबवून अमली पदार्थाच्या अड्ड्याचा शोध घ्यायला हवा तसे न झाल्यास आगामी काळात शहराची अमली पदार्थांचे शहर अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

व्यसनाधीनतेमुळे तरुणाई उध्वस्त होण्याची भीती

विविध प्रकारचे अमली पदार्थ शहरात आता सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे तरुण पिढी मध्ये ही व्यसनाधीनता अधिकच वाढत आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या अमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत असल्याने आगामी काळात त्याचे आणखीनच विघातक असते परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. यासाठी अशा प्रकारच्या अमली पदार्थांचे समूळ पणे उच्चाटन होण्यासाठी प्रशासनाने ही योग्य ती कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभावी पणे अंमलबजावणी हवी

अमली पदार्थांचे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासना तर्फे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पोलिसांनी राबविण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.मात्र वसई विरार मीरा भाईंदर शहरात पोलीसांनी ही या मोहिमेची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.अमली पदार्थ खरेदी विक्रीची ठिकाणे, शहरात अमली पदार्थ येतात कुठून त्याचे धागेदोरे कोणते आहेत ? , कच्चा माल पुरवठा, यात सहभागी असलेल्या नागरिकांचा सखोल तपास व कारवाई तरच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.