वसई: मिरा भाईंदर शहरात मराठी न बोलण्याच्या वादावरून वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे व मराठी एकीकरण समिती व अन्य संघटना यांच्या मार्फत मंगळवारी सकाळी दहा वाजल्या पासून मिरा भाईंदर शहरात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहरात सध्या मराठी भाषेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप झाला. त्याविरोधात मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा मनसेने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मनसेनेही मंगळवारी मिरा भाईंदर शहरात बालाजी हॉटेल ते रेल्वे स्थानक असा मोर्चा काढला आहे. सकाळी दहा वाजल्या पासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे. यात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते व मराठी भाषिक नागरिक व संघटना सहभागी झाल्या असून मराठी अस्मिता टिकली पाहिजे अशी घोषणाबाजी आंदोलन कर्त्यांनी सुरू केली आहे. मराठी भाषे विषयी अपशब्द व त्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही असे आंदोलकांनी सांगितले.
पोलीस आंदोलकांची अडवणूक करीत असल्याने आता छोट्या गटागटाने एकत्र येत आंदोलन सुरू आहेत. यात महिला वर्ग ही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. व्यापारी वर्गाने जेव्हा मोर्चा काढला तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविले नाही मग आम्हाला का अडविले जाते असा सवाल आंदोलन कर्त्यांकडून विचारला जात आहे. मिरा भाईंदर हे महाराष्ट्रात असताना देखील मराठी भाषिक नागरिकांना आंदोलन करण्यास पोलीस मनाई करत असल्याने ही अघोषित आणीबाणी ची लादण्यात आली असल्याची टिका आंदोलनकऱ्यांकडून सातत्याने केली होती.
आंदोलन कर्त्यांची धरपकड
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाने मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती मात्र तरीसुद्धा मोर्चेकरी ठाम राहत गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी पहाटे मनसेच्या प्रमुख नेत्यांची धरपकड सुरू झाली होती आता चे आंदोलनकर्ते आहेत त्यांची सुद्धा पोलिसांकडून धरपकड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.यात महिला व पुरुष आंदोलन कार्यांचा समावेश होता. सदर आंदोलन कार्यांऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.