भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल दोन दशकानंतर मिरा-भाईंदरमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कधीकाळी मिरा-भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष होता. मात्र, कालांतराने पक्षातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपात सामील झाल्याने स्थानिक संघटना कमकुवत झाली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या फूटीनंतर उरलेली संघटनाही अधिकच विस्कळीत झाली. तथापि, सध्या बहुतांश स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार मेट्रोच्या चाचणीसाठी मिरा-भाईंदरमध्ये येणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. जवळपास दोन दक्षकांनंतर दादानी मिरा भाईंदर मध्ये हजेरी लावली.त्यामुळे अनेक कार्यकर्ते दादांना भेटण्यासाठी उत्सुक होते. मात्र, अजित पवार यांनी केवळ मेट्रो प्रकल्पास हिरवा कंदील दाखवून लगेचच पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना संवादाची संधी न मिळाल्याने काहीसे निराश वातावरण निर्माण झाले.”अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे आमच्यात नवचेतना निर्माण झाली आहे.
येत्या महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी जोरात सुरू असून, पक्ष अधिक बळकट होईल,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आसिफ शेख यांनी दिली.