वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा येथे एकापाठोपाठ एक चार वाहनांची धडक लागून अपघात घडला आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे याच महामार्गावर सोमवारी मुंबई वाहिनीवरून वाहनांची वर्दळ सुरू असताना मालजीपाडा जवळ एका आयशर टेम्पोने ब्रेक मारला. त्यामुळे त्याच्या पाठीमागून येणारी एक चारचाकी व दोन कंटेंनर अशी चार वाहनांची धडक झाली. या धडकेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून यात चारही वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघाताच्या घटनेमुळे मुंबई वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प होती. चिंचोटी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहने बाजूला करून वाहतुक सेवा नियंत्रणात आणली.