भाईंदर: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आयुक्तालयाच्या चार विशेष पोलीस बोटी समुद्रात सतत गस्त घालत असून, संशयास्पद बोटींवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर किनारपट्टीच्या भागात ही गस्त घातली जात आहे.
सध्या आयुक्तालयाकडे सध्या १७ टन आणि १९ टन क्षमतेच्या चार बोटी आहेत. या बोटींचा वापर सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी, गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी तसेच मदत व बचाव कार्यासाठी केला जातो.अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र मार्गे घातपात घडवण्याची शक्यता लक्षात घेऊन, आयुक्त मधुकर पांडे यांनी सुरक्षाव्यवस्थेत अधिक बळकटी आणण्याचे आदेश दिले आहेत.
त्याअंतर्गत बोटींच्या गस्तीची संख्या वाढवण्यात आली असून, संशयित बोटींना अडवून त्यांची कसून तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.
चेक पोस्टवरही कडेकोट बंदोबस्त
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तन, अर्नाळा आणि वसई सागरी पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. या किनाऱ्यावर अनैतिक प्रकार घडू नये म्हणून मुख्य रस्त्यावरील
एका निश्चित अंतरावर पोलिसांमार्फत चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.त्यामुळे या चेक पोस्टवर देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहनांची झडती घेतली जात आहे.