वसई:मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात पावसाची रिमझिम सुरूच आहे. यामुळे शहरातील विविध ठिकाणचे रस्ते चिखलमय होऊन निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वसई विरार भागात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका पावसाळी पूर्व कामांना बसला आहे. वसई विरार शहरात भुयारी गटार योजना, जलवाहिन्या टाकणे, रस्ते दुरुस्ती अशा विविध प्रकारची विकास कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यासाठी त्याठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने ही विकास कामे खोळंबळी आहेत.
पावसाने खोदकामा दरम्यान वर आलेली माती पूर्णपणे भिजून गेल्याने रस्त्यावर त्याचा चिखल तयार होऊ लागला आहे.या चिखलाने पूर्णतः रस्तेच निसरडे बनले असल्याने वाहनचालकांना धोकादायक पध्दतीने वाहने चालवावी लागत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.नालासोपारा प्रगती नगर, नायगाव बापाणे रस्ता, विरार नारंगी बायपास रस्ता,वसई बाभोळा नाका, नालासोपारा हनुमान नगर यासह अंतर्गत रस्त्यावर अशा प्रकारचा चिखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विविध ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
चिखलावर दुचाकीचे चाक ही व्यवस्थित जात नाही त्यामुळे कोणत्याही क्षणी गाडी घसरून अपघात होऊ शकतो असे वाहन चालक अनिकेत पाटील यांनी सांगितले. याशिवाय बाभोळा भागात तर वळण घेताना ही अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.पालिकेने स्वच्छता विभागाकडून चिखलमय झालेले रस्ते स्वच्छता करून घ्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
उपाययोजना करण्याची मागणी
वसई विरार शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होत असताना सुध्दा नागरी सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना आखल्या जात नाहीत. किमान जिथे अपघाताची दाट शक्यता आहे तिथे तरी पालिकेने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.