वसई: नालासोपारा पश्चिमेचा सांडपाणी प्रकल्प क्रमांक ४ हा गास परिसरात उभारला जाणार आहे. मात्र येथे आरक्षित केलेली जागा हस्तांतरणाचा तिढा अजूनही सुटला नसल्याने हा मलनिस्सारण प्रकल्प अन्य ठिकाणी प्रस्तावित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.वसई, विरार शहरात ७ सांडपाणी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. वसई विरार महापालिका क्षेत्रातून दररोज २७२ दशलक्ष लिटर्स एवढे सांडपाणी निर्माण होत आहे. त्यापैकी बोळींज येथील सांडपाणी प्रकल्पात (क्रमांक २) ३० दशलक्ष लिटर्स पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र इतर सर्व सांडपाणी प्रक्रियेविनाच समुद्रात सोडले जात आहे.मागील काही वर्षांपासून शहराचे नागरीकरण व औद्योगिकरण वाढले आहे. त्यामुळे शहरातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी निघत आहे. हे पाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याने जलप्रदूषणाचेही प्रमाण वाढले आहे. यासाठी विविध ठिकाणी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करण्यावर पालिकेने भर दिला आहे.नालासोपारा पश्चिमेचा सांडपाणी प्रकल्प क्रमांक ४ हा गास परिसरात तयार केला जाणार आहे.हा प्रकल्प ३४.५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा आहे. त्याची एकूण किंमत ३२९ कोटी एवढी आहे. यासाठी पालिकेने आरक्षण क्रमांक ४०२ मधील भूमापन क्रमांक ४१० व ४११ ही जागा आरक्षित केली होती.
मात्र ही जागा महसूल विभागाची असल्याने प्रकल्प उभारणी साठी जागा हस्तांतरण करावी लागणार आहे.महानगरपालिकेस मलनि:स्सारण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जागा हस्तांतरीत करण्यासाठीचा प्रस्ताव ही जिल्हाधिकारी कार्यालयाला पालिकेने सादर केला होता. याशिवाय याचा सविस्तर अहवाल तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला होता. मात्र या प्रकल्पासाठीची जागा अजूनही महापालिकेला हस्तांतरीत न झाल्याने जागेचा तिढा अजूनही सुटला नाही. त्यामुळे सांडपाणी प्रकल्प क्रमांक ४ उभारण्यास पालिकेच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.जाग हस्तांतरण होत नसल्याने आता हा सांडपाणी प्रकल्प अन्य ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा
वसई विरारच्या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी हे प्रक्रियेविना सोडले जाते. या प्रदूषित पाण्यामुळे खाड्यातील जैवविविधता धोक्यात येते. हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने तातडीने या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी पालिकेकडे केली होती. मात्र सद्यस्थितीत जागेची अडचण असल्याने हा प्रकल्प सुरू झाला नसल्याची बाब समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आरक्षित जागेवर अतिक्रमण ?
गास येथे पालिकेने सांडपाणी प्रकल्पासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र या आरक्षित असलेल्या जागेत भूमाफियांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली असल्याने सांडपाणी प्रकल्पाची जागा धोक्यात आली आहे. हे करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. ज्या प्रमाणे नालासोपाऱ्यात आरक्षित जागेतील ४१ इमारतींचा प्रश्न निर्माण झाला होता तशी समस्या पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही नागरिकांनी सांगितले आहे.ही जागा महसूल विभागाची असल्याने त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही महसूल विभागाची असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर महसूलचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे