वसई – महामार्गाजवळ सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा उलगडा गुन्हे शाखा २ च्या पथकाने केवळ पायात बांधलेल्या एका धाग्यावरून केला आहे. या प्रकरणी एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लवेश माळी (२३) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्याच मित्रांनी क्षुल्लक वादातून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२२ नोव्हेंबर रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावजवळ बापाणे पूलाजवळ असलेल्या झुडपात पोलिसांना एक कुजलेला मानवी सांगाडा सापडला होता. त्याची काही ओळख पटत नव्हती. डोक्यावर वार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर नायगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. गुन्हे शाखा २ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ३ विशेष पथके स्थापन केली होती. ज्या ठिकाणी मृतदेह आढळळा तिथे सीसीटीव्ही नसल्याने तपास खूप आव्हानात्मक बनला होता.

हेही वाचा – देहू-आळंदी-पंढरपूरला अत्याधुनिक बसस्थानके, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

या मृतदेहाच्या पायाला एक विशिष्ट दोरा बांधला होता. आदिवासी समाजात असा दोरा बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे मृत व्यक्ती ही आदिवासी असल्याची शक्यता गृहीत धरून तपासाची दिशा ठरविण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्रे असलेले ५ हजार पत्रकं तयार करून परिसरातील सर्व आदिवासी पाड्यांमध्ये आणि गावांमध्ये वाटण्यास सुरवात केली. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. कामणच्या बीबी पाडा येथून ८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता असलेल्या लवेश माळी (२३) या तरुणाचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली. त्यांनतर जलद तपास केला आणि खबर्‍यांच्या मार्फत माहिती मिळवून ३ आरोपींना पोलिासंनी अटक केली. यामध्ये एक विधिसंघर्ष बालक आहे.

हेही वाचा – वाघोलीजवळ महाविद्यालयीन तरुणाचा खून ; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षाचे नुकसान केल्याने झाला होता वाद

याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी सांगितले की, मृत लवेश कोळी याने एका आरोपीची रिक्षा चालवायला घेतली होती. मात्र त्या रिक्षाची काच फुटल्याने आरोपी त्याच्याकडे पैसे मागत होता. त्या पैशांवरून वाद झाल्याने आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी लवेश माळीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बापाणे येथील झुडपात टाकून दिला. आरोपी आणि मृत व्यक्ती हे एकमेकांच्या परिचयाचे होते आणि त्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते असे पोलिसांनी सांगितले. केवळ पायात असेलला दोरा आणि चप्पल यावरून आरोपीची ओळख पटवून मारेकर्‍यांना पकडणे शक्य झाले असे गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूजी रणावरे यांनी सांगितले.