वसई: वसई पूर्वेतील राष्ट्रीय महामार्गावर सकवार जवळ दुचाकी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दोघे तरुण पालघर येथून लग्नसमारंभ आटोपून घरी खानिवडे येथे येत असताना हा अपघात घडला.अशोक हांडवा (२५) व पारस वरठा (१८) अशी या मयत तरुणांची नावे असून दोघे ही खानिवडे येथील हनुमान नगर परिसरात राहत होते.
शनिवारी पालघर हलोली बोट भागात नातेसंबंधात लग्नसमारंभासाठी हनुमान नगर भागातील अनेक जण गेले होते यातील काही जण दुचाकी घेऊन त्याठिकाणी गेले होते त्यात अशोक आणि पारस या दोघांचा समावेश होता.लग्न समारंभ आटोपून दोघेही हनुमान नगर येथे आपल्या घरी परतत असताना महामार्गावरील सकवार गावाजवळ सिमेंट काँक्रिटच्या दुभाजकाला भरधाव दुचाकी धडकली यात दोघांना ही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नुकताच मयत पारस याच्या बहिणीचा विवाह जमवण्याचा कार्यक्रम झाला होता.त्यातच एकमेकांच्या घराजवळील राहत असलेल्या अशोक आणि पारस याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने हनुमान नगरात शोककळा पसरली आहे .