वसई: भारतीय हवामान खात्याने वसईसहित पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला दिलेला अवकाळी पावसाचा इशारा खरा ठरला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाळा सुरवात झाली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
अवकाळी पावसाने वसई विरारमध्ये हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. या पावसामुळे रस्त्यावर व मोकळ्या झोपड्याबांधून असलेल्या मजुरांची ची सामान आवरा आवर करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली.
तर दुसरीकडे रस्त्यावर झाडे यासह जाहिरात फलक यांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले आहे. पाऊस सुरू झाल्याने वसई विरार शहरातील वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला आहे.तसेच समुद्र किनाऱ्यापट्टीच्या भागात मच्छिमार बांधवांनी बोंबील, करंदि, मांदेली, वागटी, जवळा या सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळी पावसात भिजून गेली आहे.
याशिवाय मीठ उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिक , फळबागा, यासह इतर हंगामी व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे.
लग्नसराईवर पावसाचे सावट
वसई विरार यासह इतर भागात ही लग्नसमारंभ आहेत. मात्र ऐनवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका या लग्नसमारंभाला बसला आहे. मंडप यासह सर्व डेकोरेशन साहित्य भिजून गेले आहे तर वधू वर व पाहुणे मंडळी यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.