वसई : विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथे तयार करण्यात आलेल्या जेट्टीवर लावण्यात आलेले पथदिवे हे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जेट्टीवर पूर्णतः अंधार पसरू लागला आहे. त्यामुळे येथील नागरिक व बोटीने किल्ल्यात प्रवास करणारे प्रवासी यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा व अर्नाळा किल्ला परिसर आहे. अर्नाळा किल्ला हा भाग बेटावर असल्याने त्या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी एकमेव बोटीचा आधार घ्यावा लागतो. या बोटीतून चढ उतार करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळा तर्फे जेट्टी तयार करण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून या जेट्टीवरील पथदिवे बंद स्वरूपात असल्याने नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागातून ये जा करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे.

किल्ल्यात राहणारे नागरिक हे संध्याकाळी याच जेट्टीवरून बोटीतून घरी जात असतात. तेव्हा अंधार असल्याने चालताना काही दिसून येत नाही. याशिवाय अन्य मच्छीमारांच्या बोटीची कामे ही कधी कधी जेट्टीवर सुरू असतात. त्यामुळे याभागात वीज व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. पथदिवे बंद आहेत त्यामुळे या अंधारामुळे गैरप्रकार ही घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. बंद असलेले पथदिवे तातडीने दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

अर्नाळा जेट्टीवर पथदिवे बंद आहेत ही वस्तुस्थिती आहे. याबाबत ग्रामपंचायत यांच्याशी बोलून त्या ठिकाणी पथदिव्यांची दुरुस्ती केली जाईल. – नवनीत निजाई, बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेट्टीवरील रस्त्याचे काम निकृष्ट ?

अर्नाळा जेट्टीला लागूनच किनाऱ्यावर ये जा करण्यासाठी काँक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या रस्त्याचे काम अगदी लाटांचे तडाखे सुरू असताना केले जात असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी सांगितले आहे. या कामाकडे लक्ष देऊन हे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे अन्यथा तयार केलेला रस्ता अवघ्या काही महिन्यातच फुटून जाईल असे सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील यांनी सांगितले आहे.