वसई– महापालिकेने इमारत जमीनदोस्त केल्यानंतर बेघर झालेल्या मुनिरा शेख या ८० वर्षांच्या वृध्देला अखेर वसई विरार महापालिकेने आश्रय दिला आहे. याबाबतचे वृत्त लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर पालिकेने त्वरीत मुनिरा शेख यांना वालीव येथील निवारा केंद्रात नेऊन राहण्याची व्यवस्था केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारती वसई विरार महापालिकेने जमीनदोस्त केल्या. यामुुळे २ हजार कुटुंबे विस्थापित झाली. जिथे भाड्याने घर मिळेल तिथे या इमारतीचे रहिवाशी निघून गेले. रोशनी इमारतीत राहणार्‍या मुनिरा शेख या एकट्याच रहात होत्या. त्यांना कुणी जवळचे नातेवाईक नव्हते किंवा दुसरीकडे घर घेऊन राहण्यासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे त्या एकट्याच या इमारत पाडलेल्या ठिकाणी रहात होत्या. याबाबतचे वृत्त लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झाले होते. त्यामुळे वृध्द महिलेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांना हे वृत्त समजताच त्यांनी पालिकेशी संपर्क साधला. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी देखील परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पालिकेचे पथक पाठवले. मुनिरा शेख यांची व्यवस्था वालिवच्या पालिकेच्या बेघर निवारा केंद्रात करण्यात आली होती. मुनिरा शेख यांना यापूर्वी वाईट अनुभव आले होते. त्यामुळे सुरवातील त्या जायला तयार नव्हत्या. पंरतु आम्ही त्यांची समजूत काढून त्यांना या केंद्रात नेले. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सेवेसाठी एक मदतनीसही देण्यात आल्याची माहिती बेघर निवारा केंद्राच्या प्रमुख रुपाली कदम यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनिरा शेख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्या व्यवस्थित आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेतली जाईल. त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र्य खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची काळजी घेवून पुनर्वसन मनपा मार्फत करण्यात येईल-अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका