वसई : मागील काही वर्षात रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे. या वाढत्या गर्दीमुळे रेल्वेस्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त अशा विविध बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ हवे आहे. मात्र वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार हा केवळ १०५ इतक्या कर्मचाऱ्यांवर आहे. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असतो.
वसई विरार व मीरा भाईंदर शहर हे झपाट्याने विकसित होत असून या भागातील नागरिकरण वाढले आहे. यातील बहुतांश नागरिक रेल्वे लोकल मधून प्रवास करतात. मिरारोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची ३१ किलोमीटरची हद्द आहे. यात सात स्थानकांचा समावेश होत असून याचा सर्व कारभार हा वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालतो. यातच विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरारोड ही अधिकच वर्दळीची ठिकाणे आहेत. विशेषतः याच सर्व रेल्वे स्थानकातून दररोज साधारणपणे २० ते २५ लाख इतके प्रवासी मुंबईला लोकल मधून ये जा करतात. दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत वसई रेल्वे पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे १६१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील सध्या १०५ इतके मनुष्यबळ कार्यरत आहे. तर अजूनही ५६ पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्येच रेल्वे स्थानकात गस्त घालणे, अपघात, गुन्हेगारी तपास यासह अन्य घडणाऱ्या गैर प्रकाराकडे लक्ष द्यावे लागते.मात्र वाढत्या गर्दी यापुढे आता हे मनुष्यबळ अगदी अपुरे पडू लागले आहे. त्यातच कर्मचारी आठवड्याची सुट्टी, आजारी असणे, कामानिमित्त सुट्टी अशा वेळी आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज पूर्ण करावे लागत आहे. मंजूर पदापैकी अजूनही ५५ ते ५७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याचा ताण हा सध्यास्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर येत आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा आवाका लक्षात घेता. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक बनले आहे.
पोलीस ठाणे दूरच्या अंतरावर
वसईचे असलेले लोहमार्ग पोलीस ठाणे हे रेल्वे कॉलनीच्या इमारतीमध्ये सुरु आहे. मात्र हेसुद्धा कार्यालय वसईच्या रेल्वे स्थानकापासून दूरच्या अंतरावर असल्याने येथे जाण्यास अडचणी येत असतात. यात केवळ प्रवासी नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांचीही अक्षरशः धावपळ होत असते. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वे पोलीस ठाणे स्थानकाच्या जवळच असावे अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान
रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी, मारामारीच्या घटना, छेडछाडीचे प्रकार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडतात. या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर आहे. याशिवाय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे पोलिसांवर हे सर्व कामकाज पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत असल्याचा सूर आता पोलीस वर्गाकडून उमटू लागला आहे.
वसई विरार भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मनुष्यबळ अपुरे आहे ही सत्य परिस्थिती आहे. मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही वरीष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. आवश्यक कर्मचारी मिळाल्यास गस्त घालण्यापासून ते अन्य कामकाजावर लक्ष देणे अधिक सुलभ होईल. – भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे
पोलीस कर्मचारी आकडेवारी
मंजूर – कार्यरत – रिक्त
वरिष्ठ पोलीस निरीक्षक १ – १ –
पोलीस निरीक्षक – १ – १ –
सहा. पोलिस निरीक्षक – २ – १ – १
पो. उप निरीक्षक – ४ – ४ – –
सहायक फौजदार – १२ – ३ – ९
हवालदार- ३३ – २२ – ११
इतर पोलीस अधिकारी
कर्मचारी – १०८ – ७३ – ३५
एकूण – १६१ १०५ ५६