वसई : वसई विरारची अवस्था बकाल झालेली आहे. शहराचा अपेक्षित विकास झाला नाही, त्यामुळे मागील २० वर्षांचा राहिेलेला बॅकलॉग पुढील ५ वर्षात भरून काढणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या कार्यालयाच्या उद्घघाटनासाठी फडणवीस सोमवारी दुपारी वसईत आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. विधानसभेप्रमाणे महापालिकेतही सत्तापरिवर्तन घडवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी वसई विरार मध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या निवडणुकीत तिन्ही जागा महायुतीने जिंकल्या. या नंतर पहिल्यांदाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसईत आले होते. आमदार स्नेहा दुबे-पंडित वसई रोड माणिकपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते झाले. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी जनतेने निवडून दिल्याबद्दल आभार मानले. वसईत कमळ फुलत नव्हते याची आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून खंत होती. पण वसईकरांनी स्नेहा दुबे-पंडित, राजन नाईक यांना निवडून आणून क्रांती घडवली असे ते म्हणाले.
वसई विरार मधील आधीच्या लोकप्रतिनिधींवर त्यांनी टिका केली. वसई विरार हे महापालिका क्षेत्र आहे. मात्र येथील परिस्थिती पाहता आपण नक्की शहरात आहोत की खेड्यात असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. वेळीच नियोजन झाले असते, सोयी सुविधा मिळाल्या असत्या तर मुंबई व इतर महापालिकांप्रमाणे वसई विरार महापालिकेचाही विकास झाला असता असे ते म्हणाले. वसईचा विकास न झाल्याने आगामी ५ वर्षात मागील २० वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात जाहिर केले.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन
महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. विधानसभेप्रमाणे महापालिकेत परिवर्तन घडवा, परिवर्तनाची किल्ली महापालिकेत आहे, असे ते म्हणाले. भर पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार हेमंत सावरा, आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन नाईक, भाजपाच्या नेत्या राणी द्विवेदी भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.