वसई: एकल प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याने पालिकेने शहरात प्लास्टिक जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या जप्त केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून वस्तू तयार केल्या जाणार आहे. या पुनर्वापर प्रक्रियेसाठी पालिकेने एजन्सी नियुक्त करून त्यांना पहिल्या टप्प्यात २१ टन प्लास्टिक प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आले आहे.
प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही शहरात बेकायदेशीर मार्गाने प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे.
१ जुलै २०२२ पासून आतापर्यंत पालिकेने शहरातील ६ हजार ६८० ठिकाणी तपासणी केली असून त्यात ९१२ ठिकाणी प्लास्टिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५२ टन इतके प्लास्टिक जप्त केले होते.
मात्र जप्त केलेले प्लास्टिक तसेच पडून होते. या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या पुनर्वापर प्रक्रियेसाठी नुकताच महापालिकेने मे. ग्लोबल इ-रिसायकलिंग या संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यांना हे जप्त प्लास्टिक देऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या संस्थेकडे
२१ टन इतके प्लास्टिक देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
या जप्त प्लास्टिक पासून त्याचे सुरवातीला दाणे तयार केले जाणार आहेत. त्यानंतर त्यापासून खेळणी, टेबल, खुर्च्या यासह इतर आकर्षक वस्तू तयार करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले आहे.
प्लास्टिक बाटल्या क्रशिंग यंत्र बसविणार
वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकून दिल्या जातात. त्यामुळे हळूहळू ही समस्या गंभीर बनू लागली आहे. या बाटल्या कचऱ्यात न टाकता त्याचे बारीक तुकडे करता यावे यासाठी शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक बाटल्या क्रशिंग यंत्र बसविली जाणार आहे. सुरवातीला ही पाच ते सहा ठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसविली जातील असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.