‘वास्तुरंग’मधील (२८ जून)‘घरभरल्या आठवणी’ हा सुपर्णा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख वाचल्यावर वाटले, त्यांनी आमच्याच घरातील पलंगाच्या बॉक्स आणि माळ्यावरील सामानाचे वर्णन केले आहे. म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. कधी तरी कामाला येईल, असू दे, कोकणात घरी गेलो तर नेऊन टाकू, धाकटी मोठी झाली तर पुन्हा उपयोगी पडतील, अशा अनेक समजुती मी आणि बायको दर दिवाळीला साफसफाई करताना एकमेकांना घालतो. मध्यंतरी घराला रंग लावण्याकरता सामान बाहेर काढण्याची वेळ आली तेव्हा सामान बघून मनाचा निश्चय केला की जुन्या वस्तू चांगल्या असल्या तरी पुन्हा पलंगात, कपाटात, माळ्यावर अडकवाच्या नाहीत. काटकसरीला गिळून, उदारतेचा आव आणून बऱ्याच वस्तू मोलकरणीला, कचरावालीला, वॉचमनला आणि घरी येणाऱ्या धोब्याला देण्याचा सपाटा लावला. वस्तूंचा चांगल्या प्रकारे विनियोग केला.
अगदीच ज्याची विल्हेवाट लावणे जिवावर आले, असे सामान बेडमध्ये, कपाटावर, माळ्यावर ठेवताना ‘याद्या’ केल्या व त्या त्या ठिकाणी आतल्या बाजूला चिकटवल्या, जेणे करून त्या हव्या असल्यास हमखास मिळतील.
लेखात लिहिल्याप्रमाणे जिथे जिथे आम्ही भारत फिरायला गेलो असताना आणलेल्या वस्तूंची कालांतराने अडगळ वाटू लागते, तेव्हा मला अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये विकेंडला भरत असलेल्या ‘गराज सेल’ पद्धतीची आठवण होते. तेथे बंगल्याचे मालक, नको असलेल्या, पण चांगल्या वस्तूंना किमतीचे स्टिकर लावून घरापुढे विकत ठेवतात. तेथे अशा सेकंडहॅण्ड वस्तू विकत घेणे व विकणे कमीपणाचे मानत नाहीत.
– श्रीनिवास डोंगरे, दादर

संस्कृती जपणे आवश्यक
‘वास्तुरंग’मधील (२८ जून) ‘साडेतीनशे वर्षांपूर्वीचे श्रीजोगेश्वरी मंदिर’ हा सुचित्रा साठे लिखित सचित्र लेख माहितीपूर्ण वाटला. जुन्या धार्मिक स्थळांची ओळख करून देताना आवश्यक असणारे सर्व ऐतिहासिक पुरावे तसेच पारंपरिक रूढी-परंपरा मुद्देसूदपणे मांडल्या तर त्या लेखाचे महत्त्व वाढते, हे या लेखावरून सिद्ध झाले. कोतवडे (रत्नागिरी) गावातील जवळच असलेल्या टोळवाडी शाखेच्या मोरभट महादेव भट व त्यांच्या कुटुंबीयाच्या प्रयत्नातून उभारलेले हे सडय़े-पिरंदवणे गावातील श्रीजोगेश्वरी (जुगाई) मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक नमुना तर आहेच, पण अनेक सांस्कृतिक-धार्मिक परंपरेचा एक प्रेरणास्रोत आहे. चित्पावन ब्राह्मण मंडळीतील ‘साठे’ या प्रतिष्ठित आडनावधारकांचे हे जुगाई मंदिर एक श्रद्धास्थान आहे. याच साठे, साठय़े, साठये, गोंधळेकर, गोवंडे, धारू कुटुंबीयांची ही कुलदेवता आहे. सुमारे ८-१० वर्षांपूर्वी या साठे कुल पुरस्कृत न्यासातर्फे याच पिरंदवण्यात साठे कुल संमेलन आयोजित केले गेले होते. सुदैवाने माझे आजोळ हे धारूकडे असल्यामुळे सदर संमेलनास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते. अतिशय सुनियोजित, शिस्तबद्ध व प्रसन्न वातावरणात दोन दिवस साठे मंडळींचा सहज सहवास लाभला होता. या मंडळीतील ‘धारू’ या आडनावाची फार मोठी गंमत वाटते. मुळात हे धारू आडनाव फारसे ऐकिवात येत नाही. या नावाची उत्पत्तीही सापडत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील या ‘धारू’ आडनावाची व्यक्ती दुर्मीळ आहे. माझ्या आजोळी हे एकमेव धारू कुटुंब सध्या अस्तित्वात आहे. उणेपुरे चार पुरुष व मोजून आठ महिला एवढय़ाच माफक संख्येवर
आज ‘धारू’ मंडळी सीमित झालेली आहेत. साठे कुल पुरस्कृत न्यासातर्फे या धारू मंडळीचा योग्य तो मान राखला जातोच, पण या जुगाई मंदिराच्या माहितीपूर्ण लेखाद्वारे पुन्हा एकदा त्या सडय़े पिरंदवणे गावाची नयनरम्य, आल्हाददायक, निसर्गाने बहरलेल्या वातावरणाची ओळख झाली.
– शरद वर्तक, चेंबूर.