प्रीती पेठे इनामदार

कैक वर्षे एकच निवासी पत्ता धरून ठेवला म्हणून काही बिघडत नाही. घराकडे फक्त एक शाश्वत विसावा, एक न हलणारा बळकट खुंटा म्हणून बघायला काय हरकत आहे. हां, पण परिसरात अति साचलेपण येऊ लागले असेल, किंवा पुनर्विकासाची कसरत पेलवणार नाही असे वाटत असेल, तर मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले बस्तान हलविण्याचा विचार जरूर करावा.

१९ ३०-४० च्या दशकात मुंबई, शिवाजी पार्क, माहीम – माटुंगापर्यंत वसलेली होती. १९६०-७० च्या सर्वाधिक शहरीकरणाचा दर असलेल्या दशकात ती विले पार्ले, घाटकोपरला पार करून उत्तरेला पसरली. त्या काळात विस्तारलेल्या उपनगरांमधील बहुतांश निवासी इमारतींनी आता पन्नाशी गाठलेली आहे. आपल्याकडे ८-१० शतके जुनी, दगडविटांची सुस्थितीतली मंदिरे दिमाखात उभी असली तरी सिमेंट-काँक्रीटच्या या इमारतींना मात्र अर्ध्या शतकातच पुनर्विकासाचे वेध लागलेले आहेत. देखभालीची कमतरता, लिफ्ट व पार्किंग यांची निर्माण झालेली गरज, नि:शुल्क वाढीव चटईक्षेत्राच्या नवीन सदनिकेची आकांक्षा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्यात भर म्हणजे, मद्याविक्रीप्रमाणेच भरपूर महसूल देणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या वाढीची सरकारची लालसा आहेच. जिकडे पाहावे तिकडे जुन्या इमारती पाडून त्यांच्या ५ ते १० पट उंचीच्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. आणि इमारत पाडायची म्हटल्यावर रहिवाशांसाठी घर-बदलाची प्रक्रिया ओघाने आलीच.

पुनर्विकसित होऊ घातलेल्या इमारतीतील बऱ्याच कुटुंबांची ४०-५०-६० वर्षे या एकाच घरात गेलेली असतात. तरुण वर्ग शिक्षण व नोकरीनिमित्त इतरत्र स्थलांतरित झालेला असतो. सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ मंडळीच जास्त दिसतात. अशांना विकासकाशी व्यवहार, करार आणि परिणामी घर-बदल हे मोठे दिव्यच होऊन बसते. पुनर्विकासादरम्यान फसगत झालेल्यांचे अगणित किस्से ऐकून असे वाटते की वेळीच घर विकून, तयार इमारतीत नवीन सदनिका घेणे बेहत्तर. आता बघा, आमच्याच परिसरात एका हाऊसिंग सोसायटीने आपली सबंध इमारतच विकली. विकासकाने सर्व सदनिकाधारकांना, परस्पर ठरवलेल्या भावात त्यांच्या चटईक्षेत्राप्रमाणे किंमत देऊनही टाकली. रहिवासी आता त्यांच्या आवडीनुसार कुठेही घर घेण्यास मोकळे आहेत. परंतु एका वेळेस सगळे सदनिकाधारक यासाठी तयार होणे कठीण आणि म्हणून अशी उदाहरणे फारच दुर्मीळ आहेत. असो.

‘‘आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात असल्यामुळे ती पाडून नवीन बांधून होईपर्यंत आम्हाला आता भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावे लागणार.’’ माझे हे वाक्य ऐकून माझ्या एका सहकार्याने विचारले, ‘‘किती वर्षे झाली तुम्हाला या घरात?’’ मी म्हटलं, ‘‘आमचे कुटुंब गेली ५५ वर्षे इथे राहत आहे, अगदी इमारत बांधल्यापासून.’’ त्यावर तो उद्गारला, ‘‘इतकी वर्षे एकाच जागी, एकाच घरात? हाऊ बोरिंग!’’ मी म्हटलं, ‘‘ज्यासाठी लोक घरे बदलतात जवळजवळ ते सर्व आम्हाला इथे मिळत होते. सांस्कृतिक वारसा लाभलेले, गर्द झाडींनी नटलेले, स्वच्छ परिसर, सुशिक्षित वस्ती, हाकेच्या अंतरावर दळणवळणाच्या सर्व सोयी असलेले आमचे उपनगर. नवीन झालेल्या, पण गावाबाहेर असलेल्या गेटेड कॉलनीझसारखे, प्रत्येक बिल्डिंगला फूटभर जॉगिंग ट्रॅक आणि टीचभर स्विमिंग पूल आमच्याकडे नाही. पण परिसरात मोठ्ठे तरण तलाव, मैदानं, बगीचे आणि व्यायामशाळा आहेत. मग कशाला बदलेल कुणी घर?’’

इंग्लंडमध्ये एकाच घरात राहण्याचा काळ सध्या सरासरी १९ वर्षे आहे आणि तोच अमेरिकेत १३ वर्षे. भारतासाठी अशी माहिती मिळाली नाही. पण मुद्रांक शुल्क, गृह सजावट, घरासाठीचे कर्ज अशा भारी भरक्कम प्रारंभिक खर्चांकडे बघता निदान ५ वर्षे तरी विकत घेतलेले घर बदलू नये असे म्हणतात. कमावता झाल्यापासून माझ्या त्या सहकार्याने आजपावेतो ४ निवासस्थाने बदलली आहेत. एका मैत्रिणीची तर इतकी घरे बदलून झाली आहेत की पासपोर्ट – व्हिजा काढताना तिला नाकी नऊ आले. कारण तिचे जन्मगाव, डोमिसाइलचे गाव, उच्च शिक्षणाचे, नोकरीचे व सध्या राहत असलेले गाव, सगळेच भिन्न. हे जरी टोकाचे उदाहरण असले तरी हल्ली नोकरदारांचे, नोकऱ्या व गावे बदलण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे, हे मात्र नक्की.

आता लोक एका वर्षात सॉफ्टवेअर अपग्रेड करतात, २ वर्षांत फोन बदलतात, ५ वर्षांत नोकरी बदलतात, १० वर्षांत घराचे इंटिरियर किंवा घरच बदलतात. स्टार्टअपवाले एक स्टार्टअप काढून ते जरा कुठे बाळसे धरायला लागले की विकून लगेच दुसरे काढतात. कशाशीच स्वत:ला बांधून घेत नाहीत. एकाच नोकरीत खूप वर्षे जर कुणी राहिले तर त्या माणसात धमकच नसावी असा निष्कर्ष काढतात. मान्य आहे की बदल हीच एकमेव स्थिर स्थिती आहे. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबतीत बदलाच्याच भिंगातून बघायचे काही कारण नाही. घर किंवा नोकरी बदलण्याच्या निर्णयासाठी गुणवत्ता, निष्ठा, आजूबाजूला आवडीच्या माणसांचे अस्तित्व अशी इतरही महत्त्वाची भिंगे असतातच की.

आयटी, अॅडव्हर्टाइझिंग किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या जेट सेटर्सना एकाच घरात अर्धशतक राहणे म्हणजे विचित्र आणि मागासलेले वाटते. खरे तर अशांना ऑफिसच्या कामासाठी बराच प्रवास घडतो. प्रकल्प ज्या गावात असेल, त्या गावाला दीर्घ काळ राहणे होते. बहुतांश लोक वर्षांतून एकदा-दोनदा सहकुटुंब देशोदेशीच्या सहलीला जात असतात. शाळा व महाविद्यालयांमधून लांब लांबच्या ट्रिप्स निघतात.

आजी आजोबा आपल्या इतर गावात वा परदेशात स्थित मुला- नातवंडांना सांभाळायला २-४ महिने जाऊन येतात. त्यामुळे सगळ्यांनाच वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वातावरणात राहण्याचा बदल मिळतो.

अशा परिस्थितीत, हवामानासकट सर्वच बाबतीत इतके बदल घडत असताना, कैक वर्षे एकच निवासी पत्ता धरून ठेवला म्हणून काही बिघडत नाही. घराकडे फक्त एक शाश्वत विसावा, एक न हलणारा बळकट खुंटा म्हणून बघायला काय हरकत आहे. हां, पण परिसरात अति साचलेपण येऊ लागले असेल, किंवा पुनर्विकासाची कसरत पेलवणार नाही असे वाटत असेल, तर मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले बस्तान हलविण्याचा विचार जरूर करावा.

इतकेच नव्हे तर नवीन बांधलेल्या इमारतीत ज्यांनी सदनिका विकत घेतल्या असतील, त्यांनी पुढील पुनर्विकासाची पाळी त्यांच्यावर कदाचित तीसेक वर्षांच्या आतच येईल असे गृहीत धरावे. तोपर्यंत, २८ दिवसांत १०० मजली इमारत बांधण्याचे चिनी तंत्रज्ञान भारतातही रुळलेले असेल. फार कशाला, चंद्र-मंगळावर वस्ती करण्याची शक्यताही अगदी दृष्टिपथात आलेली असू शकेल. परंतु तेव्हाही पुनर्विकास टाळण्याचा पर्याय खुला ठेवायचा असेल, तर आत्तापासूनच कानोसा घेत, सोय करण्यास सुरुवात करावी.

preetipetheinamdar@gmail.com