मान्सूनच्या काळातील (जून ते सप्टेंबर) पावसाचा अंदाज दिला जात असला, तरी तो दरवर्षी खरा ठरतोच असे नाही. १९८८ पासून वेगळ्या पद्धतीने अंदाज जाहीर केला जात आहे. तेव्हापासून आतापर्यंत काही वर्षांमध्ये हा अंदाज खरा ठरला आहे, तर काही वर्षे तो सपाटून चुकला आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी आणि हवामान विभागाने दिलेला अंदाज यांची तुलना बरेच काही सांगून जाते..
वर्ष, पडलेल्या पावसाची टक्केवारी, दिलेला अंदाज (कंसात) या क्रमाने –
१९८८-    ११९ टक्के                  (१११ टक्के)
१९८९-    १०१        (१०२)
१९९०-    १००        (१०१)
१९९१-    ९१        (९४)
१९९२-    ९३        (९२)
१९९३-    १००        (१०३)
१९९४-    ११०        (९२)
१९९५-    १००        (९७)
१९९६-    १०३        (९६)
१९९७-    १०२        (९२)
१९९८-    १०५        (९९)
१९९९-    ९६        (१०८)
२०००-    ९२        (९९)
२००१-    ९१        (९८)
२००२-    ८१        (१०१)
२००३-    १०२        (९६)
२००४-    ८७        (९८)
२००५-    ९९        (९८)
२००६-    १००        (९२)
२००७-    १०६        (९३)
२००८-    ९८        (१००)
२००९-    ७८        (९३)
२०१०-    १०२        (१०२)
२०११-    १०२        (९५)
२०१२-    ९३        (९९)

थोडे ओले थोडे सुके..
भारतात मान्सूनच्या काळात पडणाऱ्या पावसाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात बरेच चढउतार असतात. तो सरासरीच्या तुलनेत कधी खूप जास्त पडतो, तर कधी अपुरा पडून दुष्काळाला कारणीभूत ठरतो.
अलीकडच्या काळातील चांगली पावसाळी वर्षे
(कंसात त्या वर्षीच्या पावसाची टक्केवारी):
१९९४ :    ११० टक्के
१९८८ :    ११९ टक्के
१९८३ :    ११३ टक्के
१९७५ :    ११५ टक्के
१९७० :    ११२ टक्के

दुष्काळी वर्षे
(कंसात त्या वर्षीच्या पावसाची टक्केवारी):
२००९ :    ७८.२ टक्के
२००४ :    ८६.२ टक्के
२००२ :    ८०.८ टक्के
१९८७ :    ८०.६ टक्के
१९८२ :    ८५.५ टक्के
१९७९ :    ८१ टक्के
१९७४ :    ८८ टक्के
१९७२ :    ७६.१ टक्के

मान्सून : एक जागतिक घटक आला रे..
मान्सूनचे वारे पाऊस घेऊन भारतात येतात, पण त्यांच्यावर जगातील अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यांचाच उपयोग करून आगामी पावसाचा अंदाज जाहीर केला जातो. मान्सूनच्या अंदाजासाठी सध्या उपयोगात आणले जाणारे ८ घटक पुढीलप्रमाणे आहेत.
१. वायव्य युरोपातील जमिनीलगतच्या हवेचे तापमान
२. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचे प्रमाण
३. उत्तर अटलांटिक समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान
४. विषुववृत्तीय आग्नेय (दक्षिण-पूर्व) हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान
५. पूर्व आशियाई समुद्राचा सरासरी दाब
६. मध्य प्रशांत समुद्राच्या (निनो ३.४ प्रदेश) पृष्ठभागाचे तापमानाचा कल
७. उत्तर अटलांटिक समुद्रावरील सरासरी दाब
८. उत्तर प्रशांत महासागरावर १.५ किलोमीटर उंचावरून वाहणारे वारे
भारतात मान्सूनचे वारे केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतात, तेव्हा त्याचे देशात आगमन झाल्याचे मानले जाते. या वाऱ्यांची केरळात दाखल होण्याची सरासरी तारीख ‘१ जून’ आहे. मात्र, दरवर्षीच मान्सून या तारखेला केरळात दाखल होतोच असे नाही. त्याचे आगमन काही दिवसांनी पुढे-मागे होते. गेली काही वर्षे मान्सून आगमन झाल्याच्या तारखा –
२००५-    ७ जून
२००६-    २६ मे
२००७-    २८ मे
२००८-    ३१ मे
२००९-    २३ मे
२०१०-    ३१ मे
२०११-    २९ मे
२०१२-    ५ जून    

दोन टप्प्यांतील अंदाज
सध्या मान्सूनच्या पावसाचा अंदाज दोन टप्प्यांमध्ये दिला जातो. २५ एप्रिलच्या आसपास प्राथमिक अंदाज जाहीर केला जातो. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस आणखी काही घटकांच्या आधारावर सुधारित अंदाज दिला जातो. सुधारित अंदाजाबरोबरच शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये किती टक्के पाऊस पडेल याचाही अंदाज त्या वेळी दिला जातो.

पावसाच्या अंदाजाच्या मर्यादा
भारतातील पावसाच्या अंदाजाच्या तीन प्रमुख मर्यादा आहेत. त्या अशा –
१. मान्सूनला अनेक घटक प्रभावित करतात. मात्र, त्यांचा प्रभाव एकसारखा राहत नाही, त्यातही बदल होतो त्यामुळे अचूक अंदाज वर्तवणे कठीण होते.
२. एल-निनो / ला-निनाचा प्रभाव हा सुद्धा मान्सूनचा अंदाज कोलमडण्यास कारणीभूत ठरणारा घटक. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेला आणि विषुववत्तावर असलेला देश म्हणजे पेरू. या देशाच्या किनाऱ्यालगत काही वर्षांनंतर उष्ण पाण्याचे प्रवाह सक्रिय होतात. त्याचा परिणाम संपूर्ण प्रशांत महासागर आणि जगाच्या हवामानावर होतो. हा एल-निनो घटक आणि त्याच्या विरुद्ध स्थिती असलेला ला-निना घटक हेसुद्धा मान्सूनच्या पावसावर मोठा प्रभाव टाकतात. या घटकांचा नेमका अंदाज आला नाही, तर आपल्या पावसाचा अंदाज मोठय़ा प्रमाणात चुकतो.
३. देशासाठी दिला जाणारा अंदाज बऱ्याचदा बरोबर येतो. पण त्याचा स्थानिक पातळीवरील नियोजनासाठी काहीही उपयोग होत नाही. राज्य, जिल्हा किंवा प्रादेशिक पातळीवरील पावसाचा दीर्घकालीन अंदाज देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नियोजनासाठी हा अंदाज फारसा उपयोगाचा पडत नाही. कारण एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळ पडला, तरी एकूण देशात पडलेला पाऊस सरासरीइतकाच ठरतो.

अवघे सव्वाशे वयमान..
भारतातील पावसाच्या अंदाजाचा इतिहास तब्बल सव्वाशे वर्षे मागे जातो. भारतीय हवामानशास्त्र विभागाची (आयएमडी) स्थापना १८७५ मध्ये झाली. त्या वेळी या विभागाचे पहिले ‘चीफ रिपोर्टर’ म्हणून ब्रिटिश अधिकारी ब्लेंडफोर्ड यांची नेमणूक झाली होती. त्यांनी ४ जून १८८६ रोजी मान्सूनच्या पावसाचा पहिला अंदाज दिला. त्यासाठी आधार म्हणून त्यांनी केवळ एकच घटक विचारात घेतला तो होता – हिवाळा व वसंत ऋतूतील हिमालयातील बर्फाचे प्रमाण! त्यासाठी त्यांनी १८८२ ते १८८५ या काळातील हिमालयाच्या हिमावरणाचा अभ्यास केला, त्याचा पावसाशी असलेला संबंध तपासला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १८८६ साली त्यांनी पहिला अंदाज दिला.
पुढचा टप्पा होता, आयएमडीचे प्रमुख सर गिल्बर्ट वॉकर यांनी केलेल्या अभ्यासाचा. वॉकर यांनी केलेल्या मूलभूत कामामुळे १८९५ सालापासून तीन घटकांच्या आधारावर अंदाज दिला जाऊ लागला. हे घटक होते- १. ऑक्टोबर ते मे या काळातील हिमालयातील हिमावरण, २. मान्सूनपूर्व हंगामातील स्थानिक वैशिष्टय़े, ३. हिंदी महासागर व ऑस्ट्रेलियातील हवामानाची स्थानिक वैशिष्टय़े.
पुढे असे लक्षात आले, की भारताचा मोठा भौगोलिक विस्तार पाहता, त्यासाठी एकच अंदाज योग्य नाही. त्यामुळे पुढे दक्षिण भारत, वायव्य भारत व ईशान्य भारत असे तीन मोठे विभाग करून त्यांच्यासाठी पावसाची अंदाज जाहीर केला जाऊ लागला. वॉकर यांच्या अभ्यासावरच आधारित १९२४ ते १९८७ या काळासाठी पावसाचा अंदाज दिला गेला. १९८७ साली पडलेल्या मोठय़ा दुष्काळामुळे मान्सूनचा अंदाज देणारे सूत्र (मॉडेल) बदलण्यात आले. त्यानंतर ‘गोवारीकर मॉडेल’ अस्तित्वात आले. त्या वेळी डॉ. वसंत गोवारीकर हे विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे पुण्यातील हवामानशास्त्रज्ञ डॉ. व्ही. थपलियाल यांच्या नेतृत्वाखाली हवामानशास्त्रज्ञांनी नवे सूत्र तयार केले. भारताच्या पावसाच्या अंदाजाच्या इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे सूत्र ‘पॉवर रिग्रेशन मॉडेल’ म्हणून ओळखले गेले. ते हवामानाच्या १६ घटकांवर आधारित होते. हे सूत्र वापरून २००२ सालापर्यंत अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, २००२ साली पुन्हा पडलेल्या मोठय़ा दुष्काळामुळे हे सूत्र बदलले होते. २००३ नंतर वापरण्यात आलेल्या सूत्रात एकाच वेळी अंदाज न देता तो दोन टप्प्यात दिला जाऊ लागला. सुरुवातीला एप्रिलच्या अखेरीस आणि नंतर जून महिन्याच्या अखेरीस सुधारित अंदाज दिला जाऊ लागला. त्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणाऱ्या घटकांची संख्यासुद्धा कमी केली गेली. सध्या मान्सूनचा अंदाज देण्यासाठी असेच ८ घटकांचा उपयोग केले जाणारे सूत्र वापरण्यात येत आहे.