सतीश कामत

वयाच्या तिशीपर्यंत घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना. मात्र, त्यानंतर बँकेतील नोकरीमुळे आर्थिक उन्नती. चंद्रकांत बाबाजी नाईक यांचे सर्व काही बरे चालले होते. पण, समाजसेवक बाबा आमटे यांच्या सहवासामुळे प्रखर सामाजिक जाणिवा त्यांना अस्वस्थ करू लागल्या. त्यांनी नोकरी सोडली आणि मुंबईहून कुडाळ गाठले. तिथे त्यांनी स्थापन केलेले वसुंधरा विज्ञान केंद्र मुलांवर आधुनिक विज्ञानाचे संस्कार घडवत आहे.

बालपणी वडिलांचे बोट धरून कोकणातून मुंबईत स्थलांतर. तिथे लालबाग परिसरात ‘५२ चाळ’ हा त्या काळातल्या ‘दादा’मंडळींचा अड्डा असलेल्या चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत बारा माणसे. रात्री झोपण्यासाठी फुटपाथचा आसरा,  अशा प्रतिकूल परिस्थितीत वयाच्या तिशीपर्यंतचे आयुष्य गेलेले. मात्र, त्यानंतर मुंबईतल्या बँकेत नोकरी. पत्नी शाळेत शिक्षिका. दोन मुलींचे शिक्षण. निवृत्तीपर्यंतचे आयुष्य असे एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबासारखे गेलेले. पण, या वाटचालीत प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचा सहवास लाभला. प्रखर सामाजिक जाणिवांमुळे आधीपासून काहीशा अस्वस्थ असलेल्या मनामध्ये बँकेतील चाकरीच्या बेडय़ा तोडण्याची ऊर्मी उचंबळून आली. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यतील नेरूर या मूळ गावी मन धावू लागले. बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. पत्नीनेही साथ देत नोकरी सोडली. दोघे जण कुडाळजवळ नेरूरला आले. कोकणातील भावी पिढय़ांना रूढी आणि अंधश्रद्धांपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांच्यात बालपणीच विज्ञानवादी दृष्टिकोन रुजायला हवा, हे लक्षात आले होते. त्या दिशेने धडपड सुरू झाली. समविचारी माणसे गोळा होऊ लागली आणि त्यातून साकारले शाळकरी मुलांवर आधुनिक विज्ञानाचे संस्कार घडविणारे वसुंधरा विज्ञान केंद्र!

या केंद्राचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी नाईक ऊर्फ ‘सीबी’ यांनी गेल्या ८० वर्षांच्या आयुष्याची साठा उत्तरांची कहाणी अशी एका परिच्छेदात सुफळ संपूर्ण सांगितली. पण त्यांच्या बोलण्यातून आणि या केंद्राच्या भेटीनंतर त्यातले अनेक अडथळे, खाचखळगे, आजही चालू असलेली जिगरबाज धडपड, त्यातून फुलत असलेले विज्ञाननिष्ठ भावविश्व उत्कटपणे अनुभवाला येत गेले.

राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रसारासाठी बाबा आमटेंनी १९८५ मध्ये केलेल्या ‘भारत जोडो’ अभियानामध्ये सीबी सहभागी होते. त्यामुळे बाबांबरोबर त्यांचीही देशभर भ्रमंती झाली. या खंडप्राय देशाच्या सामाजिक-आर्थिक गुंतागुंतीचे विराट दर्शन या काळात सीबींना घडले. अज्ञान आणि अंधश्रद्धांच्या उच्चाटनाशिवाय आपल्या समाजाचा चिरस्थायी विकास अशक्य आहे, हे प्रकर्षांने जाणवले आणि इथेच कुठे तरी भविष्यातल्या कार्याचे बीज पेरले गेले. सीबींच्या मनातली तळमळ, तगमग बाबांना जाणवत होती. बँकेच्या नोकरीत मन रमत नव्हते. पण व्यावहारिकदृष्टय़ा सुखाची असलेली नोकरी सोडण्यालाही मन धजावत नव्हते. अखेर १९९५ मध्ये एक दिवस साधनाताई-बाबांचे पत्र आले. असे किती दिवस नोकरीला चिकटून बसणार, काही तरी वेगळे कर, असा आग्रहवजा सल्ला त्यांनी केला होता. सीबींनी फार पुढचा-मागचा विचार न करता दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. दोन वर्षांनी पत्नीनेही शाळेतली शिक्षिकेची नोकरी सोडली आणि दोघांनीही कुडाळ तालुक्यातल्या नेरूरची वाट धरली.

मुंबईत असताना मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून राजीव वर्तक या समविचारी व्यक्तीशी सीबींचा परिचय झाला होता. त्यांच्याशी या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या ग्रामीण भागात विज्ञानप्रसाराचे काम करायचे ठरवले. त्यापूर्वी  खेडोपाडी पसरलेल्या अनेक शाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक परिस्थितीची पाहणी केली. बहुसंख्य शाळांमध्ये विज्ञानाचे मूलभूत धडे देण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा तर नव्हत्याच, पण त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचा वापरही नव्हता. सीबींचा विचार आणखी पक्का झाला. ‘वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात घरातूनच वसुंधरा वैज्ञानिक केंद्राच्या कामाला प्रारंभ झाला. मग एका बँकेने फिरत्या प्रयोगशाळेसाठी गाडी दिली. त्या गाडीतून ‘सायन्स ऑन व्हील’ची कल्पना साकार करत सीबी आणि वर्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या शाळकरी मुलांना छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग दाखवू लागले. दोन खोल्यांच्या घरातून चार खोल्यांच्या भाडय़ाच्या जागेत केंद्राचे स्थलांतर झाले. पण, ही जागा नदीकिनारी असल्यामुळे पावसाळ्यात अतिशय गैरसोईचीं होऊ लागली. पुन्हा नवीन जागेचा शोध!

गावातच सरकारी आरक्षण पडलेली साडेचार एकर जागा असल्याचे लक्षात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रसन्ना यांनी जातीने लक्ष घातले. त्यानंतरच्या महिनाभरात वेगाने चक्रे फिरून ग्रामपंचायतीकडून ९९ वर्षांच्या कराराने संस्थेला ही जागा देण्यात आली. या विस्तीर्ण जागेवर बहुपयोगी विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी कल्पकतेबरोबरच मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता होती. सीबींची कामावरची निष्ठा आणि बाबा आमटेंच्या सान्निध्यात असताना झालेला लोकसंग्रह इथे कामी आला. बघता बघता ३०-४० लाख रुपये गोळा झाले. मग ही रक्कम सव्वा कोटीपर्यंत गेली. सध्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पायाभरणी झाली आणि थोडय़ाच काळात वसुंधरा केंद्राची टुमदार वास्तू उभी राहिली. संस्थेच्या प्रयोगशाळेत विज्ञानाची मूलभूत तत्त्वं, शालेय विद्यार्थ्यांना सहज करता येतील अशा प्रयोगांमधून समजावून सांगितली जातात. या सभागृहाला ‘युरेका हॉल’ असे समर्पक नाव दिलेले आहे. दूरवरचे विद्यार्थी इथे येतात. याचबरोबर भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. इथल्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’बरोबरच थ्री डी ध्वनिचित्रफिती पाहण्यासाठी निर्माण केलेले मिनी थिएटर प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, शिबिरे, अवकाश दर्शन, शैक्षणिक खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाशी मैत्री असे विविध उपक्रम राबवले जातात. मोकळ्या जागेत उभारलेले डॉ. होमी भाभा सायन्स पार्क, फुलपाखरांचे उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच फिरते वाचनालय, हे आणखी काही वेगळे उपक्रम ‘वसुंधरा’तर्फे राबवले जातात.

मराठी विज्ञान परिषदेच्या ५२ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या यजमानपदाची जबाबदारी ‘वसुंधरा’ने गेल्या वर्षी स्वीकारली आणि यशस्वीही केली. त्या निमित्ताने इथे आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. पी. एस. देवधर इत्यादींनी वैज्ञानिक विचाराच्या प्रसारासाठी ‘वसुंधरा’तर्फे चालू असलेल्या कल्पक उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

सुमारे दोन दशकांच्या या वाटचालीत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, विश्वस्त अविनाश हावळ, योगेश प्रभू, रमेश कचोलिया, विवेक सामंत, कै. ए. व्ही. राजवाडे इत्यादींनी संस्थेच्या वाटचालीत मोलाचा हातभार लावला आहे. संस्थेचे सचिव सतीश नाईक सर्व उपक्रमांच्या नियोजन आणि कार्यवाहीची जबाबदारी सांभाळत आहेत.

केंद्राला आणखी एका फिरत्या प्रयोगशाळेची गरज आहे. ‘वसुंधरा’च्या आवारातही कायमस्वरूपी सुसज्ज प्रयोगशाळा उभी करायची आहे. शक्य झाले तर तारांगणाचेही भव्य स्वप्न साकारायचे आहे.  मी आयुष्यात कधी फार पैसा नाही मिळवला, पण माणसे भरपूर जोडली, असे सीबी कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. आजही जमाखर्चाचा मेळ जमवताना थोडी ओढाताण होतेच आहे. एकविसाव्या शतकाची दोन दशके संपत आली आहेत आणि प्रगत ज्ञान-विज्ञानाची कास धरणाऱ्याच समाजाची या पुढच्या काळात सरशी होणार आहे. अशा वेळी कोकणातल्या आडगावातून विज्ञानेश्वरीच्या या वारकऱ्यांनी सुरू केलेल्या दिंडीमध्ये सर्वानीच सहभागी व्हायला हवे.

धनादेश -‘ वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’

(Vasundhara public charitable trust)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

देणगी करसवलतीस पात्र   

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

वसुंधरा विज्ञान केंद्र

मुंबई-गोवा महामार्गावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यत कुडाळ येथे शहरात जाण्यासाठी वळल्यानंतर सुमारे ८ किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर ‘वसुंधरा’ची टुमदार इमारत आहे.

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

धनादेश येथे पाठवा..

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय    

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८,अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/ २४५१९०७

दिल्ली कार्यालय      

संपादकीय विभाग,  द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३०१ उत्तर प्रदेश    ०१२०- २०६६५१५००