बिपीन देशपांडे
औरंगाबादसारख्या राज्यातील महत्त्वाच्या शहराची लोकसंख्या आहे २२ लाख आणि त्यात एक-दीड लाख महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. तरीही येथे वाचनसंस्कृतीशी नाळ जोडलेले जेमतेम हजार जण आहेत, हे फारच गंभीर आहे. मोबाइलमुळे वाचनाची आवडच कमी होत चालली आहे, असे जाणकारांचे मत आहे. ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही चळवळ कागदावरच राहिली असून अशीच परिस्थिती राज्यातील अन्य शहरांमध्येही दिसून येते.
औरंगाबादची साधारण २० ते २२ लाख लोकसंख्या. यात वाचनसंस्कृतीशी नाळ जोडलेले किती असतील, असा प्रश्न गोरख धाटबळे यांना विचारला. त्यांनी उत्तर दिले, ‘जेमतेम एक हजार जण.’ धाटबळे औरंगाबादेत घरोघर जाऊन साहित्याची पुस्तके पोहोच करतात. २०० वाचकांकडे ते दर आठवडय़ाला मागणीनुसार एक किंवा दोन पुस्तके पोहोचवतात. उदरनिर्वाहाचे साधन आणि वाचनाची आवड म्हणून त्यांनी असा व्यवसाय निवडला. कधीकाळी त्यांच्याकडे ३५० ते ४०० वाचक संख्या होती. तेव्हा बरे चालायचे. आता वाचकांची संख्या २०० वर येऊन ठेपली.
२०१५-१६ सालापासून वाचकसंख्येत घट होत आहे. म्हणजे समाजमाध्यमांच्या वापरास ग्रामीण भागात सुरुवात झाली ते हे साल. तेव्हापासून वाचनसंस्कृतीला उतरती कळा कशी लागत गेली, याचे प्रमाण धाटबळे देतात.
गोरख धाटबळे यांनी पुस्तके घरोघर जाऊन वाटप करण्याचा व्यवसाय त्यांच्या काकांपासून प्रेरणा घेऊन सुरू केला. त्यांच्यासारखे फिरत्या ग्रंथालय चळवळीशी संबंधित पूर्वी म्हणजे २००५ सालापर्यंत १० ते १५ जण होते. आता ही संख्या अवघ्या चारवर आलेली आहे. यातील प्रत्येकाकडे २०० ते २५० वाचक म्हटले तरी एवढय़ा मोठय़ा महानगरात जेमतेम एक हजाराच्या आसपास घरपोच पुस्तके मिळावी, असे वाटणाऱ्या वाचकांची संख्या.
औरंगाबाद महानगर प्रख्यात लेखक, कवी, नाटककारांचे वास्तव्याचे शहर आहे. साधारण १० ते १२ प्रकाशन संस्था येथे सुरू आहेत. त्यांच्याकडे अनेक दर्जेदार साहित्य प्रकाशनासाठी आणणारे मराठवाडय़ातील अनेक नामवंत लेखक, साहित्यिक येतात; पण वाचकवर्ग मिळत नसल्याने आलेली पुस्तके छापावीत तरी किती आणि कशी, असा प्रश्न प्रकाशन संस्थांपुढे आहे.
वाचनसंस्कृतीचा पाया शाळेतच पक्का करणे अपेक्षित. मात्र अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर साहित्य, कविता, बालसाहित्य वाचनासाठीचे उपक्रम शाळा स्तरावरून राबवण्याचे काम फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात पहिली ते दहावीपर्यंतची विद्यार्थी संख्या ९ लाख ५९ हजार ३३६ एवढी आहे. एक-दीड लाख महाविद्यालयीन विद्यार्थी. दहा ते बारा लाखांच्या आसपास ही विद्यार्थी संख्या पाहता ती एकूण लोकसंख्येच्या निम्मी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असणारे शहर. बाबासाहेबांनीही वाचनसंस्कृती रुजावी म्हणून येथे सुरू केलेले ग्रंथालय आहे.
शाळा-महाविद्यालय स्तरावर दर वर्षी वार्षिक स्नेहसंमेलने मोठा खर्च करून साजरे केले जातात. यातील एकाही कार्यक्रमात साहित्य, कवितावाचनाच्या अनुषंगाने उपक्रमांना फारसे स्थान दिले जात नाही. नृत्य, वैयक्तिक किंवा समूहाच्या कला प्रदर्शनाला शालेय संमेलनात स्थान. पाठय़पुस्तकातील लेखक, कवयित्रींनाही स्नेहसंमेलनाला निमंत्रित करण्याची परंपरा अलीकडे मोडीत निघालेली दिसते आहे. पाठय़पुस्तकातील लेखक, कवी, कवयित्री प्रत्यक्ष पाहता आली, त्यांच्याशी संवाद साधता आला तर किमान तो धडा, त्या साहित्यिकांचे साहित्य वाचावेसे वाटण्याचा विचार मनात घर करू शकतो, असा लेखकांना निमंत्रित करण्यामागचा विचार.
शिक्षकांना याविषयी विचारले असता ते पालकांकडे बोट दाखवतात. अभ्यासाशिवाय अन्य काही शिकवण्यावर पालक हरकत घेतील, अशी भीती शिक्षकांना वाटते. पालकांना शाळेत हजेरी व शिकवणी वर्गातून दिलेल्या अभ्यास, गृहपाठाव्यतिरिक्त अन्य वाचन हे वेळ वाया घालवण्याचे कारण वाटते, असा साधारण शिक्षक वर्गाचा सूर. शाळा- शिकवणी वर्गातून दिलेला साचेबद्ध अभ्यास हाच अधिक पालकांना महत्त्वाचा वाटतो. अभ्यासिकांनाच ग्रंथालये म्हणून ओळख मिळू पाहते आहे.
एकूणच साहित्यवाचनाशी संबंधित उपक्रम राबवण्याबाबत उदासीनताच अधिक. गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी हे सांगतात, ‘‘साहित्यनिर्मितीच्या अनुषंगाने मुलांच्या अभिव्यक्तीला चालना देण्याचा उपक्रम शाळेत राबवला जातो. जवळपास ७५० कवितांचे चार ते पाच काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘चला बाल साहित्यिक बनू या’ हा उपक्रम घेतला जातो. मुलांमध्ये वाचनसंस्कृती आणि साहित्यनिर्मितीसाठीची अभिव्यक्ती निर्माण व्हावी, असा प्रयत्न सुरू असतो. अर्थात साहित्याबाबत आवड आहे तिथेच असे उपक्रम राबवण्यात येतात.’’
गोरख धाटबळे यांच्याकडे असलेल्या २०० वाचकांपकी बहुतांश हे चाळिशीतील किंवा त्या पुढील. तरुण वर्ग फारसा नाही. मग तरुण काय करतो? त्यांच्यापकी अनेक बेरोजगार; पण डोकेमोबाइलमध्ये गुंतलेले. वाचनाविषयी त्यांच्याकडे विचारणा केली तर मोबाइलवर वाचन करता येते, साहित्यही वाचायला मिळते, असे छापील उत्तर अनेक तरुण देतात. प्रत्यक्षात मोबाइलवर साहित्य शोधून वाचले जात नाही. औरंगाबादचा कॅनॉट प्लेस, विद्यापीठ परिसर किंवा अनेक कॉलन्यांमध्ये सायंकाळी तरुणाईच्या फौजा मोबाइल हातात घेऊन एकएकटेच बसलेले पाहायला मिळतील.
शासन स्तरावरून ग्रंथालय चळवळ अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली- ‘गाव तेथे ग्रंथालय’ हे घोषवाक्य घेऊन. राज्यात साधारण ४५ हजार गावे आहेत, तर ग्रंथालय १२ हजार १४८ आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे ४ हजार २४० वाचनालये ही एकटय़ा मराठवाडय़ात आहेत. यामधील बहुतांश ग्रंथालये ही अनुदानासाठी सुरू केलेली, काहींची पुस्तकेही कागदावरच. यावर पांघरूण घालणारी एक सरकारी यंत्रणाही तयार झाली. म्हणजे दोन ‘लाभार्थी’ तयार झाले. एक काहीही न करता ग्रंथालयाच्या अनुदानाचा लाभ घेणारा आणि दुसरा सरकारी यंत्रणेतील. शासनाकडे ग्रंथालय सुरू करण्यासाठीचे सुमारे दोन हजार प्रस्ताव पडून आहेत. अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. २०१२ पासून अनुदान वाढ बंद आहे. ग्रंथपाल व शिपाई ही पदे मानधनावरच आहेत.
‘गाव तेथे ग्रंथालय’ चळवळ पुढे न्यायचीच असेल आणि बोगस ग्रंथालयांचा बंदोबस्त करायचा असेल तर १९६७ साली अस्तित्वात आलेल्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळ कायद्यात बदल करण्याचा एक मार्ग आहे; पण त्याला हात घातला जात नाही. ग्रंथालय खर्च दरडोई तीन पसे नाममात्र आहे, तो वाढवला जात नाही. सीएसआर (कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडाच्या माध्यमातूनही चळवळीचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे, पण ते होत नाही. यामध्ये नेटाने आणि नि:स्पृहपणे जीवन विकाससारखी ग्रंथालये चालवणारे भा. बा. आर्वीकर आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहणारे व वाचनसंस्कृतीविषयी आस्था राखणारे गोरख धाटबळेसारखी माणसे अडचणीत येतात, भरडली जातात. ग्रंथालय चालवणे हे आता प्रतिष्ठा म्हणून मिरवण्याचे क्षेत्र राहिले नाही, असे हताश उद्गार या क्षेत्रातील मंडळींच्या तोंडी असतात.