कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात उन्हाळी नाचणीचा प्रयोग राबवण्यात आला. ५ वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. तेव्हा सलामीलाच चांगले उत्पादन आले. हुरुप वाढल्याने व्याप्ती वाढवली. आता कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाळी नाचणी शेती चांगलीच फुलली आहे. राज्यात अन्यत्र उन्हाळी नाचणीचे पिक प्रति एकरी ८ ते १० टन क्विंटल असताना मात्र कोल्हापूर जिल्ह्यात ते १६ ते १८ टन म्हणजे जवळपास दुप्पट आहे. पौष्टीक अन्न म्हणून ओळखली जाणारी नाचणी ही तृण धान्याचा एक घटक आहे. मानवी आहारातून नाचणीमुळे सशक्त अन्न मानवाला मिळत असताना हेच पीक कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवत आहे.

२०१८ साल हे देशात पौष्टीक तृण धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. या काळात बाजरी, नाचणी, वरई, राळं (कांगणी अथवा ककूम) शाळु, ज्वारी, कोद्रा इत्यादी धान्य यांचा समावेश असणारी तृण धान्य ( मिलेट) याचे अधिकाधिक पिक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व दुष्काळी भागात खरीप हंगामात पिकवले जातात. या अन्न घटकामध्ये चांगली ताकत व विविध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता असते. करोना संसर्गाच्या काळात अन्न घटकांमध्ये प्रतिकारशक्ती असणारा पदार्थ सेवनात येण्याची गरज किती आहे हे दिसून आले होते.

हेही वाचा…लेख: मोदी असूनही थेट परकीय गुंतवणूक नाही?

कोल्हापूर जिल्ह्यात या अंतर्गत नाचणी तृण धान्य पिक उन्हाळी हंगामात घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. गुजरातच्या दक्षिणेकडील भागापासून ते केरळच्या सह्याद्री डोंगर रागांच्या प्रदेशात नाचणी पिक घेतले जाते. खरीपात नाचणीचे पिक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. नाचणीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अति जास्त पाऊस आणि कमी पाऊस अशा दोन्ही प्रसंगी नाचणी पिकाची चांगली उगवण होते. कोल्हापूरातील पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असतो. परंतु उन्हाळ्यात सिंचनाची पुरेसी व्यवस्था नसल्याने कोणते पिक घ्यायचे असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर असतो. त्यातूनच कमी पावसात वाढ होणार्‍या नाचणी पिकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.

या करीता कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे असलेल्या पन्हाळा तालुक्याची निवड करण्यात आली. या तालुक्यात प्रथमच नाचणीचे गैरमोसमी उत्पादन घेण्याचा प्रयोग असल्याने एका अर्थाने ती कृषी विभागाची आणि पिक घेणार्‍या शेतकर्‍यांचीही कसोटी होती. दोन्हीकडे हुरहुर,उत्सुकता होती. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिक येणार का या विषयी शंका बोलून दाखवल्या जात होत्या. परंतु कृषी विभागाच्या आत्मा विभागाने ही योजना हिरीरीने राबवण्याचे नियोजन केले. महाबीजच्यावतीने शेतकर्‍यांना मोफत एकरी २ किलो बियाणे देण्यात आले शिवाय उत्पादीत होणारे बियाणे हे संशोधित बीज, बियाणे म्हणून खरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्यासाठी बाजाराभावापेक्षा अधिक चांगली रक्कम देण्याची तयारी दर्शवण्यात आली. या पहिल्यावाहिल्या प्रयोगामध्ये १८ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला. एकंदरीत १५ एकरामध्ये गैरमोसमी नाचणी उत्पादन घेण्याचा प्रयोग सुरु झाला. कृषी विभागाच्यावतीने मोफत बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा करण्यात आला. गादीवाफ तयार करून २ रोपांमध्ये १० सेमीचे अंतर ठेवून लागवड करण्यात आली. सुरूवातीला लक्षपूर्वक पाणी द्यावे लागले. पण फुटवे आल्यानंतर पंधरवड्यातून पाणी दिले तरी चालत होते. विशेष म्हणजे निसर्गानेही साथ दिली. मावा, खोड अशी कोणतीही रोगराई आली नाही. फुले नाचणी या जातीचे पिक घेण्यात आले. सुमारे १३० दिवसांनंतर पिक हाताशी आले. चांगली उगवण दिसून आली. शेतकर्‍यांना एकरी १६ ते १८ क्विंटल इतके उत्पादन मिळाले. अन्यत्र ते सरासरी ८ ते १० क्विंटल असते. बाजारात प्रति क्विंटल २२०० रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी समाधानी दिसले.

हेही वाचा…लेख: ‘फुकट’चे कल्याण नको रे बाबा…

पहिला प्रयोग यशस्वी होताना दिसू लागला तसतसे नाचणीचे विपणन मुल्य (मार्केटींग व्ह्याल्यू) वाढवण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबवण्यात आले. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाचणीचे अन्नधान्यातील वेगवेगळ्या चवदार अन्नपदार्थात समावेश करणे हा होता. त्यासाठी कोल्हारातील स्वयंसिद्धा या महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. त्यातून पन्हाळा तालुक्यात महिलांसाठी नाचणीपासून तयार होणार्‍या पदार्थांची स्पर्धा घेण्याचे नियोजन केले. कारणा आजवर नाचणी म्हटले की भाकरी आणि अंबील इतपतच लोकांना पदार्थ माहित होते. पौष्टिक अन्न असलेल्या नाचणीचे बाजारपेठेतील महत्व वाढवायचे असेल तर त्यापासून उत्पादित होणार्‍या पदार्थांचे जाळे वाढवणेही गरजेचे आहे. नाचणीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने स्थुलपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे, आळशीपणा, वजन वाढणे, शारीरीक क्षीणता यावर मात करता येणे शक्य होणार होते. त्यासाठी नाचणी अन्न पदार्थ स्पर्धा आयोजित केली असता ६८ महिलांनी ७४ प्रकारचे लज्जतदार पदार्थ बनवले. त्यामध्ये नाचणीपासून शिरा, सुकडी, करंजी, मोदक, चकली यापातून ते गुलाबजाम पर्यंत वेगवेगळे पदार्थ होते.

नाचणीच्या भाकरीला या भागात पूर्वी आहारात वापर होत होता. जवळपास घरोघरी नाचणीची भाकरी खाली जात होती मात्र मधल्या एका काळात ज्वारीची पांढरी शुभ्र भाकरी खाणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाऊ लागले. किंबहुना मराठवाड्यातून बडे शेतकरी, व्यापारी तेथे पिकणारी ज्वारी घेऊन कोल्हापूरच्या या डोंगराळ भागात आणून विकत असत. त्यांच्या या पांढरी भाकरीचे विपणन तंत्र इतके प्रभावी ठरले की हळुहळु नाचणीची भाकरी खाणे कमी झाले. किंबहुना नाचणीची भाकरी खाणे कमी प्रतीचे असा अपप्रचार होत राहिला. परंतु आता पुन्हा एकदा नाचणीचे महत्व लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. औषधी गुण असणारे, चांगली प्रतिकार क्षमता असणारे तृणधान्य खाण्याला महत्व आले आहे. त्यामुळे नाचणीपासून तयार होणारे खाद्य पदार्थ लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्याला बाजारात मागणीही येऊ लागली आहे. हे सारे पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील गैरमोसमी नाचणी उत्पादन प्रयोगाला यश आले असे म्हणावे लागेल.

हेही वाचा…लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता नाचणी उत्पादक शेतकर्‍यांची संख्या वाढत चालली आहे. पन्हाळा तालुक्यानंतर भुदरगड, राधानगरी, शाहुवाडी, करवीर, चंदगड या तालुक्यातही नाचणीचे पिक उन्हाळ्यात घेतले जात आहे. नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यात सन २०२४ मध्ये २०० एकरवर नाचणीचे पिक घेण्यात आले. ७२ शेतकर्‍यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. नाचणीचा चारा हा जनावरांसाठीही पौष्ठिक मानला जातो. यामध्ये लोह, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. अशा सत्वयुक्त चार्‍याला बाजारात मागणी चांगली असते. नाचणीचा चारा विकुन एकरी ६ ते ७ हजार रुपये मिळतात. यापासून उत्पादन खर्च निघतो. केंद्र सरकारने अलिकडेच वेगवेगळ्या पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. नाचणीच्या हमीभावातही वाढ झाली आहे. एकरी अधिक उत्पादन, मशागत कमी, एकरी चांगली उत्पादकता, रोगराई कमी अशा अनेक कारणांमुळे नाचणी उत्पादकांची संख्या या भागात वाढत राहील, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा…लेख: विद्यापीठांतील अविवेकामागे लोकशाहीचा ऱ्हास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) या विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाळी नाचणी पिकाचा उपक्रम घेतला. त्यासाठी तत्कालीन कृषी अधिकारी डॉ. ज्ञानदेव वाकुरे, डॉ. अशोक पिसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. शेतकर्‍यांचा सहभागही उत्साहवर्धक होता. मनामध्ये शंका होत्या. परंतु योग्य नियोजन केल्यामुळे नाचणीचे पिक चांगले आले. त्याला चांगला दर मिळत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गैरमोसमी नाचणी पिक प्रयोगाला चांगले यश आले आहे, असा विश्‍वास वाटतो. – पराग परीट (आत्मा, गगनबावडा तंत्रज्ञान व्यवस्थापक)