गेल्या दहा दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. वळवाबरोबरच पावसाची रिपरिप म्हणजेच भीज पाऊस असल्याने जमिनीत पाणी साठा खूप झाला असून, याचा सर्वाधिक फटका नदीकाठी असलेल्या काळ्या जमिनीला बसणार आहे. वारंवार ऊस शेतीमुळे आणि बेसुमार रासायनिक खतांचा वापर यामुळे या जमिनी नापीक होत आहेत. या पावसाने नापीक जमिनीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता अधिक आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा झाला, तरच जमीन पिकासाठी अन्नरस निर्माण करू शकते. क्षारपड जमीन ही कसदार कृष्णाकाठची डोकेदुखी बनली असून, ही जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी सच्छिद्र नलिका निचरा प्रणालीचा वापर करून अतिरिक्त पाणी बाहेर काढणे आवश्यक ठरते. यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लाभार्थ्यांनीही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जमीन क्षारपड होऊन नापीक होण्याचे प्रमाण गेल्या दोन दशकांमध्ये जास्त दिसते. पूर्व भागातील दुष्काळी टप्प्यात असलेल्या माळरानावर द्राक्ष, डाळिंब ही नगदी पिके हमखास उत्पन्नाची म्हणून त्यांची लागवड वाढत गेली. मात्र काळजाच्या तुकड्यागत गाळ माती असलेल्या नदीकाठच्या जमिनी कसहीन बनल्या व नापीक झाल्या. या जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी क्षारपड जमीन सुधारणा प्रयोग हाती घेण्यात येत असून, यामुळे पुन्हा या जमिनी लागवडीखाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हटले, की कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगेच्या काठावरची काळी कसदार जमीन डोळ्यांपुढे उभी राहते. या कसदार जमिनीवरच या भागाने कृषी क्षेत्रात सुजलाम् सुफलाम् अशी झेप घेतली. ऊस, भाजीपाला यांसारख्या नगदी पिकांची मोठी लागवड होऊ लागली. मात्र, गेल्या काही वर्षांत याच भागात क्षारपड होऊन नापीक होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे सर्वत्र दिसत आहे. जमिनीच्या या आजारामुळे या पट्ट्यतील शेतीच धोक्यात आली आहे. आता या जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आजारावरची कारणे शोधत त्याप्रमाणे उपाय केले जात आहेत.
जमीन क्षारपड, पाणथळ, क्षारयुक्त झाली, की ती शेतीयोग्य राहत नाही. ती अशी होण्याची अनेक कारणे आहेत. जमिनीची पोटातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुळाच्या सान्निध्यात हवा खेळती राहत नाही व पिकांना प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि उपयुक्त जिवाणूची वाढ होत नाही. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे पिके पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात. सोडिअम व क्लोराईडचा पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढते. मातीच्या कणावरील सोडिअमचे प्रमाण वाढल्यावर जमिनीची घडण बिघडते, अशी माती ओली झाल्यावर चिकट बनते आणि उन्हाळ्यात कोरडी झाल्यावर कठीण व टणक बनते. घट्ट जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही.
एकदा का जमीन क्षारयुक्त झाली, की यामध्ये साधे गवतही उगवत नाही, ऊस शेती तर दूरची गोष्ट. पडीक जमिनीमध्ये केवळ वेडी बाभळच आपला विस्तार करते. यामुळे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी तर नावावर जमीन असूनही भूमिहीन ठरण्याची उदाहरणे या भागात आहेत. पाण्याची उपलब्धता असूनही जमीनच नापीक झाल्याने हाडाचा शेतकरी हतबल झाला. यावर संशोधन करून जलसंपदा विभागाने क्षारपड व पाणथळ जमीन सुधारणा मोहीम हाती घेतली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा व पलूस तालुक्यातील काल-परवापर्यंत माणूस पेरलं तर उगवणारी गाळवट जमीन आज क्षारपड आणि पाणथळ झाली आहे. अशा जमिनींची सुधारणा करण्यासाठी पुढील उपायांचा एकात्मिक वापर करणे गरजेचे आहे.
निचरा पद्धतीचा वापर
क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा पद्धतींचा वापर करणे अतिमहत्त्वाचे असते. जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्य होणार नाही. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्वेक्षण, नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्र असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो.
निचरा पद्धतीमुळे पुढील फायदे मिळतात. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पिकांच्या कार्यक्षम मुळांची वाढ होते. तापमान संतुलित राखण्यास मदत होते. विविध पद्धती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे वातावरण जमिनीत असणा़ऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते. तसेच भूपृष्ठावर क्षार साठविण्याची क्रिया मंदावते आणि जमीन लागवडीखाली येते. पाण्याचा निचरा होत असल्याने वापसा येत असल्याने पिकांचे बीजांकुरण होण्यास मदत होते.
जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उघडे चर व भूमिगत निचरा या दोन पद्धतीचा वापर करता येतो. यापैकी भूमिगत निचरा पद्धती अधिक लाभदायी ठरते. जमिनीची धूप थांबते, उघड्या चरीसाठी जमीन गुंतवण्याची गरज भासत नाही. जमिनीखाली तीन ते पाच फूट खोल सच्छिद्र नलिका वापरून अतिरिक्त पाणी बाहेर काढले जाते. यामुळे मशागत, काढणी व अन्य कामे करण्यात कोणताही अडथळा येत नाही. देखभाल अथवा दुरुस्तीची किमान २५ वर्षे गरज पडत नाही.
भूमिगत सच्छिद्र पाईप
जमिनीच्या पृष्ठाभागाखाली एक ते दीड मीटर खोलीवर सच्छिद्र पी.व्ही.सी. ड्रेनेज पाईप टाकून त्या पाइपाभोवती फिल्टर म्हणून ४.५ ते १० सें.मी. जाडीचा चाळ वाळूचा थर किंवा कापडी फिल्टर (जिओ टेक्स्टाईल फिल्टर) गुंडाळून पाइप जमिनीमध्ये गाडाव्यात. या पद्धतीत मुख्य नळी, उपमुख्य नळ्या व उपनळ्या यांच्या जाळ्यांची अशाप्रकारे रचना केली जाते, की जेणेकरून पिकांच्या मुळांच्या कक्षातील क्षार व अतिरिक्त पाणी मातीतून पाझरून प्रथम उपनळ्यांमध्ये येते आणि उपनळ्यांतील पाणी उपमुख्यनळ्यांमध्ये येऊन मुख्य नळीतून शेवटी हे पाणी नैसर्गिक निगमस्थान उदा. ओढा, ओहोळ किंवा नदी इत्यादीमध्ये नेऊन सोडावे. ज्या ठिकाणी नैसर्गिक निगमस्थान उपलब्ध नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतील पाणी सम्पवेल (विहीर) किंवा शेततळ्यामध्ये एकत्र करून हे पाणी उपसा करावे लागते.
दोन उपनळ्यांमधील (लॉटरल ड्रेन) अंतर निचरा पद्धतीच्या यशस्वितेसाठी दोन लॉटरल पाइपमधील अंतर योग्य ठेवणे अति महत्त्वाचे असते. हे अंतर मातीची जलसंचालकता, खोली, निचरायोग्य सच्छिद्रता आणि कमी कराव्या लागणाऱ्या भूमिगत पाण्याची पातळी इत्यादी बाबींवर अवलंबून असते. भारी ते मध्यम खोल काळ्या जमिनीसाठी हे अंतर तीस मीटरच्या दरम्यान ठेवावे.
सपाट जमिनीतील निचरा प्रणाली वापरताना उतार दिल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येणार नाही. पण त्याचबरोबर त्या निचरा पाईपची खोली १५ सें.मी. पेक्षा कमी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. निचरा पाईपला जास्तीत जास्त २ टक्के उतार द्यावा. पण वेगवेगळ्या व्यासांच्या पाईपसाठी वेगवेगळा कमीत कमी ढाळ द्यावा लागतो, तो पुढीलप्रमाणे-
जमिनीचे व्यवस्थापन
जमिनीचे सपाटीकरण – ज्या जमिनी उंच-सखल आहेत किंवा अति चढ उताराच्या आहेत, अशा जमिनीसाठी सपाटीकरण आवश्यक आहे. शेतात उंचवट्याच्या ठिकाणी पाणी पोहचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहोचते व सखल भागात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात साचते. शिवाय वाजवीपेक्षा जास्त उतार असेल, तर वाफ्यात किंवा पिकात दिलेले पाणी उताराच्या दिशेने निघून जाते. यामुळे पिकांना किंवा वाफ्यांना पाणी कमी उपलब्ध होते. क्षार समस्या असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त वाढलेली आहे, त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पावसाचे पाणीसुद्धा उताराच्या दिशेने चरीत सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी तुंबून न राहिल्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी कमी ठेवता येते. त्यामुळे भारी जमिनीत ०.०५ ते ०.२५ टक्के, मध्यम जमिनीत ०.२० ते ०.४० टक्के व हलक्या, रेताड जमिनीत ०.२५ ते ०.३५ टक्के उतार समाधानकारक असतो.
पाणी नियोजन – जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये या साठी भरमसाट पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ठिबक सिंचनासारखे प्रभावी अस्त्र वापरले पाहिजे. ठिबक सिंचनातून मचूळ अथवा खारवट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरीत्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रकार व प्रमाण तसेच जमिनीची प्रतवारी पहाणे हे आवश्यक असते.
जमिनीची मशागत – जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते व पृष्ठाभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलरसारखे अवजार वापरून खोलवर नांगरणी करता येते.
माती परीक्षण – खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत, त्याची तपासणी करावी व नंतर सुधारणेचे उपाय करावेत. खतांची मात्रासुद्धा माती परीक्षण करून द्यावी.
रासायनिक खत – क्षार व चिबड जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय स्फुरद, लोह व जस्ताची कमतरतासुद्धा आढळते, त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खत वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकविता येते.
कंपोस्ट कल्चरचा वापर – क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गांचा एकत्रितपणे अवलंब करावा लागतो. कंपोस्ट कल्चरचा वापर, टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करून क्षारपड मार्गावर असणा़ऱ्या जमिनी थोपवून धरण्याचा एक मार्ग आहे. कंपोस्ट खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्याने माती कणांची रचना बदलते आणि हवा, पाणी यांचे प्रमाण प्रमाणशीर राहते.
digambarshinde64@gmail. com