play-logoनव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
काय योगायोग आहे बघा. ३० जुलैला गुरुजींचा म्हणजे सोनू निगमचा (गेल्या आठवडय़ात ती प्ले लिस्ट होती) वाढदिवस आणि ३१ ला गुरुजींच्या गुरुजींची पुण्यतिथी! रफीसाब नसते तर काय ऐकले असते आपण? भारतीय चित्रपट संगीताचे काय झाले असते? गायकीला पाश्र्वगायनाची दिशा कोणी दिली असती? आणि आपले काय झाले असते? प्रेमात पडल्यावर, विरहात, आनंदात, दु:खात कोणाचा आवाज ऐकला असता? आणि आपल्याला सोनू निगम तरी कसा मिळाला असता? मोहम्मद अजीजम्, शब्बीर, महेंद्र कपूर या गायकांनी काय केले असते? गायकांचे सोडा, राजेंद्रकुमार, जॉय मुखर्जी, मनोजकुमार, भारत भूषण आपल्याला (आज आवडतात तेवढे तरी) आवडले असते का? शम्मीसाहेबांच्या जंगली हालचालींना सुरेल कोणी बनवले असते? देव आनंदच्या मान हलवण्याला अर्थ कोणी दिला असता?  दिलीपकुमारच्या सहज सुंदर अभिनयाला न्याय देतील, अशी गाणी कोणी गायली असती? ‘चलो दिलदार चलो’मध्ये लतादीदींबरोबर कोण गायले असते? त्यांनी ‘सुहानी रात ढल चुकी’ कोणासाठी आणि का बनवले असते? ओ.पी. नय्यरांच्या टांग्यात बसून ‘फिर वोही दिल लाया हू’, ‘मांग के साथ तुम्हारा’ कोणी गायले असते? शंकर जयकिशनना ‘याद न जाए बीते दिनों की’ची चाल सुचली असती का? रोशनजींनी ‘बरसात की रात’मध्ये कशी गाणी केली असती? लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या ‘आवाज मै ना दूंगा’ला कोणी आवाज दिला असता?
जुन्या कॅसेट्सचा एक ड्रॉवर, अनेक एमपी३ सीडींचा एक कप्पा फक्त रफीसाहेबांनीच भरला आहे माझा. सुमारे पाच हजार हिंदी गाणी, त्यात मराठीसह इतर भाषा धरून सगळी मिळून २५ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत महागुरूंनी! आजच्या प्लेलिस्टमध्ये घेऊ  यातली कुठली गाणी घेऊ?  हा प्रश्न पडलाय. .असे करू या.. प्रत्येक अभिनेत्याला आणि संगीतकाराला समान न्याय देऊ या. प्रत्येकी दोन दोन गाणी..
रफीसाहेबांनी सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर गायली आहेत. सर्वात आवडत्या दोनपैकी पहिले अर्थातच ‘आज मौसम बडा’ आणि दुसरे म्हणजे ‘वापस’ चित्रपटातले ‘आयी बहारों की  शाम’. खास करून त्यातली ‘क्या जाने..’ची जागा. धुक्याने भरलेला आवाज. अद्भुत! असाच धुक्याचा आवाज ‘जाग दिले दीवाना’ या ‘उंचे लोग’मध्येपण ऐकू येतो.. संगीतकार- चित्रगुप्त. या जोडीचे अजून एक आवडते गाणे म्हणजे ‘चल उड जा रे पंछी..’ साधेपणा, सहजता याचं उदाहरण! हीच सहजता रफीसाब भारत भूषणसाठी गायलेत तेव्हा दिसून येते. मग ‘बैजू बावरा’मधल्या बंदिशी, उपशास्त्रीय गाणी असोत किंवा ‘जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात की रात’ असो. ‘मन रे तू काहे ना धीर धरे..’, राजेंद्रकुमार – ‘मेरे मेहेबूब’, ‘याद ना जाए’, मनोजकुमार – ‘रहा गर्दिशोंमें हरदम’, ‘ए वतन..’, जॉय मुखर्जी – ‘बडे मियाँ दीवाने’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, विश्वजीत – ‘पुकारता चला हू मै’, ‘तुम्हारी नजर क्यूं खफा हो गयी’.. आणखी किती तरी..  आपण फक्त गाणी ऐकायची. पाहायला कशाला जायचे?
शम्मी कपूरच्या बाबतीत मात्र तसे करता येत नाही. ‘तारीफ करूं क्या उसकी’चा ‘ता’ ऐकल्यावरच डोळ्यासमोर शम्मीसाहेब उभे (आडवेतिडवे) राहतात.  शम्मीसाहेब म्हणे त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिगला उपस्थित असायचे आणि रफीसाहेबांना सांगायचे, की या गाण्यात मी या ओळीला असे हातवारे करणार आहे वगैरे. नंतर नंतर रफीसाहेबांना याचीपण गरज पडेनाशी झाली एवढे ते शम्मीसाहेबांच्या अ‍ॅक्टिंगला ओळखून होते. तसे असल्याशिवाय ‘देखिये साहेबां वो कोई और थी’ हे गाणे बनलेच नसते. देव आनंदबरोबरच्या गाण्यांचेही तेच. दु:ख दाखवतानाही आपली स्टाइल कायम ठेवणारे देव आनंद यांना आवाज देताना रफीसाहेबांनीसुद्धा हे भान ठेवलेले दिसते. ‘क्या से क्या हो गया’ आणि ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया’ तसेच ‘मै जिंदगी का साथ निभाता’, ‘अभी ना जाओ छोड कर’ (चित्रपट- हम दोनो) ही गाणी याचे उत्तम उदाहरण आहे. ‘कभी खुद पे..’मध्ये ‘हालात’ आणि ‘रोना’ला घेतलेल्या वेगवेगळ्या जागा.. आहाहा!
दिलीपकुमार आणि रफीसाब म्हणजे दृक् -श्राव्य आनंद! ‘टुटे हुवे ख्वाबोने’, ‘मधुबन मे राधिका’. जंपिंग जॅक जितेंद्रसाठी रफीसाबसुद्धा चंचल गायकी वापरतात. उदाहरणार्थ ‘कितना प्यारा वादा’, ‘गोरिया कहा तेरा देस’. धर्मेन्द्र- त्या काळचा सर्वात सुंदर, हँडसम नायक. त्याच्यासाठीची गायकीही तेवढीच सुंदर.. बघा ना.. ‘आपके हसीन रुख पे..’ किंवा लताबरोबरचे ‘ये दिल तुम बिन कही लगता नही’.. पुन्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल!
रफीसाहेबांबरोबर गाजलेली अशीच अजून एक उत्तुंग जोडगोळी म्हणजे शंकर जयकिशन. ‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘मै गाऊ ँ तुम सो जाओ’. शंकर जयकिशनचेच ‘लिखे जो खत तुझे’.. हे शशी कपूरसाठी. तसेच ‘तुम बिन जाऊँ कहाँ’. एसडी बर्मनसाहेबांबरोबरची ‘खोया खोया चांद’ आणि ‘ऐसे तो ना देखो’ विसरून कशी चालतील? आणि चिरंजीवांबरोबरची ‘चांद मेरा दिल’ आणि ‘मैने पूछा चांद से..’हीसुद्धा. विसरायचा काही चान्सच नाही. आपल्या आणि आपल्या पुढच्या अनेक पिढय़ांना पुरून उरणारा आवाज आहे हा. रफीसाबच म्हणून गेलेत. – ‘तुम मुझे यूं भूला ना पाओगे.’

हे  ऐकाच..  : अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन
रफीसाहेबांचा जीवनपट कुठल्याशा कार्यक्रमात जावेद अख्तरसाहेबांनी आपल्यासमोर मांडला आहे. तो कार्यक्रम कुठला होता माहीत नाही, पण हा पाऊण तासांचा व्हिडीयो यू टय़ूबवर उपलब्ध आहे. जीवनपटच नाही, तर त्यांची गायकी, एका रसिकाच्या आणि विश्लेषकाच्या नजरेने जावेदसाहब आपल्यासमोर उलगडून दाखवतात, त्यांच्या गायकीतले बारकावे आपल्याला दाखवून देतात. रफीसाब महान होते हे आपल्याला माहितीच आहे, पण हा व्हिडीयो पाहिल्यावर त्यांच्या महानतेची अजून ठळकपणे जाणीव होते. न चुकता आवर्जून पाहा. तसेच काही वर्षांपूर्वी रफीसाहेबांचा पट्टशिष्य या नात्याने सोनू निगमने ‘अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन’ या कार्यक्रमाद्वारे आपल्या गुरूला दिमाखात श्रद्धांजली वाहिली आहे. हा कार्यक्रमसुद्धा यू टय़ूबवर आहे. सुमारे ७५ जणांचा सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत घेऊन सोनू निगमने गायलेली रफीसाहेबांची गाणी चुकवू नये अशीच आहेत.