बॉलीवूड सेलिब्रिटींची बिझी लाईफस्टाईल असते. विशेषत टॉपची हिरोईन वेळ कसा मॅनेज करत असेल असे अनेक प्रश्न पडतात ना ? अभिनेत्री करीना कपूर खानला मात्र स्वतसाठी वेळ देणं महत्त्वाचं वाटतं. मनसोक्त, स्वच्छंदपणे फिरायला तिला आवडतं. त्यासाठी ती आवर्जून वेळ काढते. याच विषयावर करीनाला बोलतं केलंय खास ‘व्हिवा’साठी..
भाऊबिजेच्या दिवसाची संध्याकाळ. खार येथील धर्मा प्रॉडक्शनचे प्रशस्त कार्यालय व त्यातील करण जोहरची केबिन आणि करणच्या खुर्चीवरील करीना कपूर-खान हिच्या भेटीचा योग.. दिवाळी सुखी व आनंदाची जाण्यासाठी आणखी काय हवे? ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा भाग म्हणून या ‘भेटी’चे आयोजन होते. अशा ‘भेटीची संधी’ घेत इतर विषयांकडे वळणे पसंत केले. करीनाचा ‘मूड’ नेहमीच  ‘झक्कास’ असतो, त्यामुळे तिला ‘बोलते’ ठेवणे सोपे जाते. गप्पांचा विषय वळला कलावंतांच्या बिझी लाईफस्टाईलकडे. कलावंतांच्या लाईफस्टाईलबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. ते किती वेळ शूटिंगमध्ये असतात, शूटिंगचे तास विचित्र असतात. रात्री- बेरात्री त्यांना काम करावे लागते.
’ चित्रपटांचं शूटिंग, सैफसोबतचा संसार, फिटनेसची काळजी, विदेश दौरे यातून स्वत:साठी रिकामा वेळ तो कसा मिळतो?
मिळतो ना, करीना अर्थात बेबो पटकन बोलते व मग शब्दांवर स्वार होत सांगू लागते,  ‘मनसोक्तपणे फिरण्यासाठी वेळ काढणे’ ही माझी अगदी बालपणापासूनची हौस व सवय मी आजही सोडलेली नाही. ‘रिफ्यूजी’पासूनच्या माझ्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत मी मूळची फिरण्याची हौस जरा जास्तच विकसित केली आहे. म्हणजे, एखाद्या ठिकाणी दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा गेल्यावर त्याकडे मी अगदी नवीन दृष्टीने पाहते. मला वाटते, तशा सवयीने माझा मूळचा अवखळपणा व आजचा परिपक्वपणा यांची सांगड घातली जाते. पुन्हा हे फिरणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे, चित्रीकरणाच्या निमित्ताने देश-विदेशात दूर-दूर जाणे होते व दुसरे म्हणजे आवर्जून सुट्टी घेऊन जुन्या मित्रमैत्रिणींसोबत आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे. माझे शाळेपासूनचे मित्र आजही माझ्यासोबत आहेत व त्यांच्यात असताना मी माझा पेशा अर्थात मी अभिनेत्री असणे कधी व कसे विसरते हेच समजत नाही. पण ते माझ्या जरा जास्तच पथ्यावर पडते.
’ अशा दोन्ही प्रकारच्या फिरण्याचे तुझे अलीकडचे अनुभव कोणते?
 ‘गोरी तेरे प्यार में’चेच उदाहरण बघा. त्यासाठी मी ‘रिफ्यूजी’नंतर बऱ्याच वर्षांनी गुजरातमधील भूज येथे गेले. पूर्वीचे भूज एक साधे गाव होते. आठवडय़ातून दोनदा फक्त मुंबईवरून विमान जाई. तेव्हा राहण्याच्याही फारशा सुविधा नव्हत्या. पण फार पूर्वापार मला फिरण्याची सवय असल्याने असल्या अडचणींचे कधीच कुठे काही वाटत नाही. पण आज भूज कमालीचे बदलले आहे. आता तेथे जायला दररोज विमान आहे, ते एकूणच छोटेसे शहर झाले आहे, राहण्याच्याही सुविधा वाढल्यात. असे बदल पाहताना माझा मी काही विचार करत असते, तो नेमका काय हे असे पटकन शब्दांत सांगता येणार नाही. पण मला कोणत्याही प्रदेशातला ग्रामीण भाग खूप जास्त भावतो, अगदी विदेशातही गेल्यावर मला तेथील ग्रामीण भागाची विशेष ओढ असते. शहरी जीवनातील गती, दिखाऊपणा, मोबाईल व्हॉटस्अपवरचे एकमेकांशी संपर्कात राहणे या साऱ्याचा मला बऱ्याचदा कंटाळा येतो. हे सगळे नकोसे वाटते. त्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेचे साधे, सरळ, शांत आयुष्य, इतरांशी आपुलकीने संवाद साधण्याची वृत्ती व एकूणच हिरवेगार वातावरण हे सगळं मनाला तजेलदारपणा देणारे असते. अगदी या चित्रपटाच्या मध्यंतरानंतरचे कथानक ग्रामीण भागातील आहे म्हणूनच मी या चित्रपटात भूमिका साकारायला होकार दिला, असे म्हटले तरी चालेल.
’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तुझा भटकंतीसाठी खासगी दौरा असेलच ना? खास करून आता सैफसोबत…
नुकतीच मी सैफबरोबर लंडनला गेले होते, त्याने ‘हमशकल’च्या चित्रिकरणातून माझ्यासाठी वेळ काढला. पुढील महिन्यात मी रजेवर आहे, तेव्हा एक तर इटली, ग्रीस येथे जाईन अथवा राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर परिसरात असेन. तेथे आतापर्यंत किती वेळा गेले असेन याची गणतीच नाही. मला ते राजेराजवाडे, त्यांची भव्यता, आदबशीर वागणे एकूणच अगदी वेगळे वातावरण खूपखूप सुखावते. त्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातही मी जाते, म्हटलं ना, आपण कोण आहोत हे विसरून प्रवासाला गेलो तर त्याचा खूपखूप आनंद मिळवता येतो. तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो.
’ अशा फिरण्याचा तुला अभिनय व व्यक्तिमत्त्व विकास या दोन्हींसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो असे म्हणायचे का?

अर्थातच, मी नुसतीच फिरत नाही अथवा ठिकठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाही हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. मी स्थानिक जीवनशैली, प्रथा, मानसिकता, वातावरण जाणून घेते, अनेकांशी छोटय़ा-मोठय़ा गप्पा करते, त्यातून बऱ्याच, बऱ्याच गोष्टी ज्ञात होत जातात, आपल्यात बदल होत जातो. या साऱ्याचा चित्रपटासाठी भूमिका करताना कुठे तरी फायदा होतो व चित्रपटसृष्टीत वावरतानाही ते लहान-मोठे अनुभव सतत उपयोगी पडतात. एखादी भूमिका साकारताना पटकन आठवते, अरे अशी व्यक्ती मला अमूक ठिकाणी भेटली होती, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन असा होता वगैरे वगैरे. मन आणि मेंदू जागे ठेवून फिरले की सगळ्या गोष्टी चांगल्या व सकारात्मक घडतात. आपणही तेवढेच उत्साही व तजेलदार राहतो. कोणत्याही प्रकारचे फिरणे कंटाळवाणे नसते, पण त्याचा खरा आनंद घेण्याची आपली प्रवृत्ती हवी.
’ चित्रपट स्वीकारताना भूमिकेसह भटकंतीच्या संधीचाही विचार करतेस का?
चित्रपटाचे स्वरूप समजले की त्याचे चित्रीकरण बंगलोरला होणार की स्वित्र्झलडला याची कल्पना येते. पण त्यातही मी चित्रपट स्वीकारताना दिग्दर्शक व एकूणच त्याचे युनिट कसे आहे ते पाहते. कारण, त्या एका चित्रपटासाठी त्यांच्यासोबत तब्बल दोनशे दिवस काढताना कुठेही कंटाळा येता कामा नये अथवा पहिल्या काही दिवसांतच, अरे बापरे यांच्यासोबत अजून किती दिवस काढावे लागणार, असा प्रश्न पडू नये. यापूर्वी तीन-चार चित्रपटांच्या वेळी मी तसा प्रचंड कंटाळा अनुभवला आहे, भले मग आपल्या आवडत्या जागी चित्रीकरण का ना असेना! तेव्हा माझा एकूणच अंदाज चुकला म्हणून मी सावध झाले. युनिट चांगले असेल तर जगात कोठेही चित्रीकरण का असेना, त्यात कामाचा व फिरण्याचा दोन्हींचा आनंद मिळतो, करीना आपला उत्साह कायम ठेवत म्हणाली. या गप्पा पुन्हा ‘गोरी तेरे प्यार में’कडे वळल्या, पण करीनाच्या उत्स्फूर्त व डौलदार व्यक्तिमत्त्वात तिच्या मनसोक्त फिरण्याच्या आनंदाचा महत्त्वाचा वाटा आहे, हे एव्हाना लक्षात आले होते. तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतच ही भेट आटोपती घेतली.
’ अशा फिरण्याचा तुला अभिनय व व्यक्तिमत्त्व विकास या दोन्हींसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो असे म्हणायचे का?

अर्थातच, मी नुसतीच फिरत नाही अथवा ठिकठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाही हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. मी स्थानिक जीवनशैली, प्रथा, मानसिकता, वातावरण जाणून घेते, अनेकांशी छोटय़ा-मोठय़ा गप्पा करते, त्यातून बऱ्याच, बऱ्याच गोष्टी ज्ञात होत जातात, आपल्यात बदल होत जातो. या साऱ्याचा चित्रपटासाठी भुमिका करताना कुठे तरी फायदा होतो व चित्रपटसृष्टीत वावरतानाही ते लहान-मोठे अनुभव सतत उपयोगी पडतात. एखादी भूमिका साकारताना पटकन आठवते, अरे अशी व्यक्ती मला अमूक ठिकाणी भेटली होती, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन असा होता वगैरे वगैरे. मन आणि मेंदू जागे ठेवून फिरले की सगळ्या गोष्टी चांगल्या व सकारात्मक घडतात. आपणही तेवढेच उत्साही व तजेलदार राहतो. कोणत्याही प्रकारचे फिरणे कंटाळवाणे नसते, पण त्याचा खरा आनंद घेण्याची आपली प्रवृत्ती हवी.
’ चित्रपट स्वीकारताना भूमिकेसह भटकंतीच्या संधीचाही विचार करतेस का?
चित्रपटाचे स्वरूप समजले की त्याचे चित्रीकरण बंगळुरूला होणार की स्वित्र्झलडला याची कल्पना येते. पण त्यातही मी चित्रपट स्वीकारताना दिग्दर्शक व एकूणच त्याचे युनिट कसे आहे ते पाहते. कारण, त्या एका चित्रपटासाठी त्यांच्यासोबत तब्बल दोनशे दिवस काढताना कुठेही कंटाळा येता कामा नये अथवा पहिल्या काही दिवसांतच, अरे बापरे यांच्यासोबत अजून किती दिवस काढावे लागणार, असा प्रश्न पडू नये. यापूर्वी तीन-चार चित्रपटांच्या वेळी मी तसा प्रचंड कंटाळा अनुभवला आहे, भले मग आपल्या आवडत्या जागी चित्रीकरण का ना असेना! तेव्हा माझा एकूणच अंदाज चुकला म्हणून मी सावध झाले. युनिट चांगले असेल तर जगात कोठेही चित्रीकरण का असेना, त्यात कामाचा व फिरण्याचा दोन्हींचा आनंद मिळतो, करीना आपला उत्साह कायम ठेवत म्हणाली. या गप्पा पुन्हा ‘गोरी तेरे प्यार में’कडे वळल्या, पण करीनाच्या उत्स्फूर्त व डौलदार व्यक्तिमत्त्वात तिच्या मनसोक्त फिरण्याच्या आनंदाचा महत्त्वाचा वाटा आहे, हे एव्हाना लक्षात आले होते. तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतच ही भेट आटोपती घेतली.