हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणरायाच्या आगमनाने वातावरण प्रसन्न, पवित्र झालं आहे. मखरात बसलेला मंगलमूर्ती गणपती हसऱ्या चेहऱ्याने तुमच्याकडे पाहत आहे. मोदकांचा नैवेद्य, देखणी आरास सगळं कसं एखाद्या चित्रात शोभावं, असं सुबक! अशा या वातावरणाला खऱ्या अर्थाने मंगलमय करतात अगरबत्तीची सुगंधी, वेटोळी वलयं. अगरबत्ती, धूप, कापूर यांच्या मिश्र सुवासाने जो माहोल निर्माण होतो तो खरंच मनाला शुभकार्याची जाणीव करून देतो. वर्षांनुवर्षे आपल्या घरातील मंगलकार्याना ज्या अगरबत्तीने अशाप्रकारे सुगंधी करून सोडलं, ती सायकल ब्रँड अगरबत्ती !

भारतीय धार्मिक मनाला शुभकार्यच कशाला अगदी रोजच्या पूजेसाठीही अगरबत्ती हवीच. देवाला दिवा लावून अगरबत्ती फिरवल्यावर घरात पसरणारा सुगंध हा नित्यकर्माचा भाग आहे. अशा रोजच्या पूजेची सुगंधी सोय गेल्या ६९ वर्षांपासून सायकल ब्रँड अगरबत्ती करत आहे. तिचीही कहाणी.

तामिळनाडूतल्या एका छोटय़ाशा गावात कन्नड भाषिक ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला चुणचुणीत मुलगा म्हणजे एन रंगाराव. त्यांचे वडील शिक्षक होते. रंगाराव ६ वर्षांचे असतानाच वडील गेले. मागे काहीही पै-पुंजी न सोडता. पण रंगारावना शिक्षणाची आस होती. त्यामुळे ते पेरियाकुलमच्या शाळेत शिकू लागले. वयाच्या ११व्या वर्षी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी त्यांनी शाळेत बिस्कीटं विकून पैसे कमवायला सुरुवात केली. पण त्या व्यवसायातही स्पर्धा होतीच. त्यांच्याच शाळेतला दुसरा एक मुलगा बिस्कीटं विकू लागला होता. मग रंगारावनी आपल्या बिस्कीटांसोबत पेपरमिंट गोळी मोफत देण्याची योजना जाहीर केली. त्या दुसऱ्या मुलाला आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. भावी उद्योजक बनण्याची बीजं अशाप्रकारे छोटय़ा मोठय़ा घटनांतून पेरली जात होती.

कॉलेजचे शिक्षण घेत असताना रंगा रावना टायपिंग शिकण्याची खूप इच्छा होती. पण पैसे नव्हते. ते रोज टायपिंग क्लासबाहेर उभं राहून मुलांना टायपिंग करताना पाहत राहत. असेच बरेच दिवस गेले. त्यांची जिद्द पाहून तिथल्या शिक्षकांनाही राहवलं नाही. त्यांनी रंगारावना मोफत शिकवण्याचं कबूल केलं. मात्र एक अट ठेवली. रंगारावने या मोफत शिकवणीच्या बदल्यात ५ विद्यार्थी क्लासला मिळवून द्यावे. असे लहान प्रसंग माणसाची काहीही आत्मसात करण्याची जिद्द ठळकपणे अधोरेखित करतात. रंगाराव अर्थात सफल झाले. लग्न झाल्यावर रंगा रावनी कारकून म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथून कूर्गमधल्या एका कॉफीच्या कंपनीत काम करत ते व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. पण आपल्याला आयुष्यात काही वेगळं करायचं आहे, याची खूणगाठ पक्की होती. कूर्गमधली स्थिर नोकरी सोडून एके दिवशी त्यांनी मैसूरला स्थलांतर केलं आणि ‘मैसूर प्रॉडक्ट अँड जनरल ट्रेडिंग कंपनी’ स्थापन केली. भांडवल अर्थातच सहज उपलब्ध होणारे नव्हते त्यामुळे प्रॉव्हिडन्ट फंडाच्या पैशांचा आधार घेतला. त्यांची ही कंपनी शिकेकाई, केसांचे तेल, अगरबत्ती अशी उत्पादनं बनवत असे. हळूहळू त्यातील अगरबत्तीचा व्यवसाय वाढत गेला. त्याला चांगली मागणी येऊ लागली. एन रंगाराव हे काही त्या व्यवसायातील तज्ज्ञ नव्हते. या व्यवसायातील माणसांना भेटून, पुस्तकं वाचून त्यांनी माहिती मिळवली. आपली अगरबत्ती सुवासिकच नाही तर वजनाला हलकी असावी असा त्यांचा कटाक्ष होता. अगरबत्तीच्या पॅकिंगसाठी मोठा मुलगा गुरु आणि मुलगी यांना ते हाताशी घेत. स्वत: मार्केटिंग करत फिरत. हस्सन आणि चिकमंगळूर या बाजूच्या दोन शहरांचा पर्याय विक्रीसाठी त्यांच्यासमोर होता. त्यात चिकमंगळूर येथे मालाला मागणीही होती. पण तरी एन रंगाराव यांनी हस्सनची निवड केली. जिथे मागणी असल्याने स्पर्धा आहे तिथे न जाता जिथे मागणी नाही त्याठिकाणी पूर्णपणे नव्याने व्यवसाय निर्माण करण्याचे तंत्र त्यांनी वापरले. त्यात ते यशस्वीही ठरले. आपली अगरबत्ती विकण्यासाठी एन रंगाराव यांनी वापरलेली युक्ती खरंच अभ्यासण्याजोगी आहे.१९५६-५७ साली बांधणीकरता लागणारा खर्च टाळत ग्रिजप्रूफ पेपरमधून त्यांनी पँकिंग सुरु केले.एक आण्याला २५ अगरबत्त्या ते विकत.या ब्रँडला ‘सायकल” हे तसे रूढार्थाने वेगळेच नाव देण्याचे कारण एकच होते.सर्व भारतीय भाषांमध्ये “सायकल” हा शब्द परिचित होता आणि त्याचा अर्थ ही न बदलणारा सहज उमगणारा आहे.

१९४८ पासून सुरु झालेला ह्य ब्रँडचा प्रवास आज ६९ वर्षांंत अखंड सुरु आहे.१९८० साली एन रंगाराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढच्या पिढीने ही धुरा यशस्वीपणे पेलली.हा व्यवसाय यशस्वी होण्याची मुख्य कारणं एन रंगाराव यांच्या वर्तनात होती.वेळप्रसंगी आपल्या कर्मचारम्य़ांना कंपनीत उशीर झाल्यास स्वत:च्या घरीही ते झोपू देत इतकं कौटुंबिक वातावरण होतं.आपल्या प्रतिस्पध्र्यालाही मदत करण्याची सहृदयता एन रंगाराव यांनी दाखवली होती.तीच परंपरा दुसरम्य़ा वं तिसरम्य़ा पिढीने पुढे नेली आहे.भारतातील अगरबत्ती व्यवसायाची वार्षिक उलाढाल अडीच हजार कोटींच्या घरात धरली तर त्यात ३० % वाटा सायकल ब्रँडचा आहे.भारतासह ६५ देशातील वातावरण हा ब्रँड सुगंधी करतो.५०० विविध सुगंध या अगरबत्तीने घरोघरी पोहचवले आहेत.अगरबत्ती व्यवसायासोबत कार व रूमफ्रेशनर्सही ‘लिआ’ या ब्रँडखाली ही कंपनी निर्माण करते.या इतक्या मोठय़ा पसारम्य़ातही अगरबत्तीच्या ज्वलनाने निर्माण होणारम्य़ा कार्बनच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचा पर्यावरणपूरक प्रय हा ब्रँड करतो.आणि त्यासाठी सायकल ब्रँडला पुरस्कार ही देण्यात आलेला आहे. गणपती,नवरात्र,दिवाळी यांची चाहूल सायकल ब्रँडच्या जाहिरातींनी अचूकपणे होते.’प्रार्थना की शुद्धता” या टॅगलाईनसह सध्या सौरव गांगुली आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे सेलेब्रिटी सायकल ब्रॅण्डच्या सुवासात हरवून जाताना आपण पाहतो.मध्यंतरी सचिन तेंडुलकरच्या शंभर धावांच्या शंभरीवेळी सायकल ब्रँडने केलेले ‘एव्हरीवन हॅज रिजन टू प्रे ‘ हे विशेष कॅम्पेन गाजले होते.

वास्तविक मनापासून पूजा करताना धुप,दीप,अगरबत्ती हे निव्वळ उपचार आहेत असं अगदी संतांनीही सांगितलं आहे.तरीही पवित्र,शुद्ध,सात्विक वातावरण निर्मितीची किमया या अगरबत्तीत निष्टिद्धr(१५५)तच आहे.सायकल ब्रँड अगरबत्तीतून निर्माण होणारा सुगंध हा एन रंगाराव यांच्या मेहनतीचा,कष्टाचा,कल्पकतेचा कस्तुरीस्पर्श लेवून निर्माण झालेला आहे.त्यामुळे तो केवळ रंध्रांना नाही तर अंत:करणाला स्पर्शून जातो.ह्य सायकलचा प्रवास खऱ्या अर्थाने सुगंधी आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information on cycle pure agarbatti brand cycle pure product
First published on: 25-08-2017 at 00:35 IST