पावसाला सुरुवात झाली की, डोंगर हिरवेगार होतात, ओढ्यांना नवा जीव मिळतो आणि थंडगार हवा मनाला शीतलता देऊन जाते. पण अशा वेळी या पाऊससरींचा आनंद घेण्यासाठी अनेकदा तरुणाई नेहमीच्या लोकप्रिय ठिकाणीच गर्दी करते. लोणावळा, महाबळेश्वर, माळशेज ही तशी पावसातली नेहमीची ठिकाणं… पण, निसर्ग संपूर्ण शांततेत अनुभवायचा असेल, पावसाच्या थेंबांशी एकांतात संवाद साधायचा असेल, तर आपल्या महाराष्ट्रात आणखी काही खास ठिकाणं आहेत, जी आपल्याला निसर्गाची एक वेगळी ओळख करून देतात.
कोकणातलं रत्नागिरीतील हे लपलेलं रत्न! ‘माचाळ पठार’ म्हणजे एक नैसर्गिक गालिचा. पावसात इथे रानफुलांचा खजिना खुलतो. गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या फुलांनी सजलेली जमीन म्हणजे जणू निसर्गाचं चित्रप्रदर्शन. इथे फारशी वस्ती नाही, त्यामुळे फक्त तुम्ही, ढगांची सावली, आणि थेंबांची लय. पठारावर जून अखेरपासून सप्टेंबरपर्यंत असंख्य रानफुलं उमलतात गुलाबी, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगांची झळाळी असते. ढगांमध्ये लपेटलेलं पठार, दूरवर वळणाऱ्या रस्त्यांचं सुंदर विहंगम दृश्य. जुलै ते सप्टेंबर हा येथे जाण्याचा सर्वोत्तम कालावधी. लांजा रेल्वे स्थानकावरून किंवा खासगी वाहन घेऊन येथे जाता येतं. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरूनही खासगी वाहनाने येथे जाता येतं.
एका दिवसात फिरून यायचं असेल, तेही जवळच्या जवळ तर, ‘अहुपे घाट’ हा नाणेघाटालगतचा पर्याय उत्तम. अहुपे हा तसा दुर्लक्षित घाट आहे. नाणेघाटाच्या ऐतिहासिक वाटा ओलांडून तुम्ही जसजसं पुढे जाल, तसं निसर्गाचं रम्य रूप समोर येईल. पावसात धबधब्यांनी घाट गच्च भरतो. वाटसरूंचं प्रमाण कमी, त्यामुळे निसर्गाशी नातं अधिक घट्ट होत जातं. नाणेघाटाच्या प्रसिद्ध डोंगरवाटांपलीकडे वसलेला अहुपे घाट अजूनही बहुतेक पर्यटकांच्या नकाशावर नाही. फार कमी ट्रेकर्स इथे पोहोचतात, त्यामुळे निसर्गाशी जवळीक साधता येते. अहुपे गाव हे घाटमाथ्यावरील लहानसं गाव आहे, जे ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर येतं. खूप कमी लोकवस्ती आणि निसर्गरम्य असलेलं हे गाव पावसाळ्यात खुलून दिसतं. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कळंबमार्गे (ठाणे जिल्हा) आणि एक पुणेमार्गे (ट्रेकसाठी) पुणे, आळेफाटा, ओतूर, घाटघर, नाणेघाट ट्रेकिंग पथ ते अहुपे घाट. नाणेघाट ट्रेक करत करत पुढे अहुपे घाटाकडे वाट वळते. ही वाट मध्यम ते कठीण श्रेणीची आहे. हा मार्ग ट्रेकर्ससाठी अधिक योग्य आहे. कळंबमार्गे जाताना कल्याण, मुरबाड, कळंब, देहरंडी, जांभूळपाडा, अहुपे गाव या मार्गावरून तुम्ही थेट अहुपे गावात वाहनाने जाऊ शकता. अहुपे गावात फारशी सुविधा नाही. शक्य असल्यास जांभूळपाडा किंवा मुरबाडमध्ये मुक्काम करावा. येथे जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा आणि त्यानंतरचा हिरवाईचा काळ असतो. ऑगस्ट महिन्यात धबधब्यांचा भरपूर जलप्रवाह आणि ढगांची सुंदरता अनुभवता येते. पाऊस जोरात असल्यास घाटावर वाऱ्याचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे काळजीपूर्वक चढाव-उतार घ्या.
मुंबईपासून दूर काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असल्यास कोलितमारा, मोरशी-चिखलदरा हा पर्याय नेहमीच चांगला. सातपुड्याच्या कुशीतल्या या आदिवासी भागात अजूनही पर्यटकांची गर्दी पोहोचलेली नाही. पावसात इथली जंगलं, गवताळ पठारं आणि छोटेसे धबधबे मनाला शांत करणारे असतात. स्थानिकांची साधी जीवनशैली आणि निसर्गाची कधी न ओसरणारी लय इथे अनुभवता येते. कोलितमारा हे गाव जसं नकाशावर अर्धदृश्यमान आहे, तसं ते प्रत्यक्षातही शांत, गूढ आणि गहिरं वाटतं. अजूनही इथे पर्यटनाचा गवगवा नाही. म्हणूनच येथे पावसात भटकणं म्हणजे निसर्गाशी आत्मीयतेनं संवाद साधणं. हिरव्या गवताळ पठारांवर उमललेली रानफुलं आणि मधूनच येणारं धुकं, पावसाच्या सरी आणि पक्ष्यांचे आवाज. शांत, प्रदूषणमुक्त आणि शहरापासून पूर्णपणे दूर. अमरावती जिल्ह्यात, मोरशी तालुक्यातील हे गाव मोरशी आणि चिखलदरा या दोन ठिकाणांदरम्यान वसलेलं आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासचा भाग. येथे जाण्यासाठी बडनेरा (अमरावती) रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचं स्थानक आहे. बडनेरा / अमरावतीहून बस किंवा भाड्याचं वाहन घेऊन मोरशी कोलितमाराला जाता येतं. शक्य असल्यास मोरशी किंवा चिखलदरा इथं राहण्याची सोय करून कोलितमाराला भेट द्यावी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्यामुळे पक्ष्यांचे निरीक्षण, काही वेळा सांभर, रानडुक्कर, वानर यांचंही दर्शन इथे होतं.
नाशिक जिल्ह्यातील ‘अलंग-मदन-कुलंग’ किल्ले ही जागा म्हणजे निसर्गाचं एक शांत आश्रयस्थान. पावसात धुक्याने झाकलेले डोंगर, अगम्य वाटा असलेलं गाव हे दृश्य इथे मनावर कोरलं जातं. हे तीन अत्यंत कठीण आणि साहसी गड म्हणून ओळखले जातात. हे तिन्ही किल्ले नाशिक जिल्ह्यात, इगतपुरी तालुक्याजवळच्या पश्चिम घाटात आहेत. येथे मुंबई / नाशिकहून घोटेगाव, अंबेवाडी, साम्रद गावाच्या पायथ्यापर्यंत गाडीने जाता येते.
गर्दीपासून दूर, नकाशावर न दिसणारी, पण मनात घर करणारी ही ठिकाणं. ज्यांचा अनुभव एकदा तरी घ्यावाच. भटकंती ही नेहमी गंतव्यस्थानी पोहचण्यासाठी नसतेच, ती असते स्वत:ला शोधण्यासाठी. यंदाच्या पावसात या नव्या वाटा नक्की अनुभवा!
viva@expressindia.com