मितेश जोशी

मराठी मालिका विश्वातील हरहुन्नरी चॉकलेट बॉय अभिषेक रहाळकरच्या मते खाणं केवळ पोटालाच नव्हे तर मनालाही आधार देतं. आजच्या सदरामध्ये वाचूयात अभिषेकचा खाद्यानुभव..

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

अभिषेक मूळचा नाशिकचा. सध्या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्ताने तो ठाण्यात राहतो आहे. सकाळी चित्रीकरणासाठी घराबाहेर पडण्याआधी पहाटे लवकर उठून स्वत:ची स्वत: न्याहारी बनवण्याची सवय त्याने लावून घेतली आहे. अभिषेकच्या दिवसाची सुरुवात ज्यूस, प्रोटीन शेक किंवा स्मूदीसारख्या हेल्दी पेयाने होते. चित्रीकरण स्थळी पोहोचल्यावर पुन्हा एक हेल्दी शेक पिऊन तो कामाला लागतो. त्याचा दुपारच्या जेवणाचा भाजी-पोळीचा डबा सेटवर येतो. संध्याकाळी सेटवरच्या नाश्त्यावर ताव मारला जातो आणि रात्रीचं जेवण पुन्हा घरी येऊन करण्याची सवय त्याने स्वत:ला लावून घेतली आहे.       

नाशिकचा असल्याने तिथल्या खाद्यसंस्कृतीत सर्वोच्च पदावर असलेला पदार्थ म्हणजे भेळभत्ता. चित्रीकरणातून सुट्टी मिळाली की अभिषेक नाशिकला घरी जातो. नाशिकहून परत येताना डझनभर भेळभत्त्याची पाकिटं तो सोबत घेऊन येतो. भेळभत्त्याच्या या प्रेमाविषयी सांगताना अभिषेक म्हणतो, ‘वडीलधारी मंडळी आठवडय़ाच्या बाजाराला गेली की आम्हा शेंडेफळांना आकर्षण असायचं ते भेळभत्त्याचं. भेळभत्ता कधी येतो आहे आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकून आपण कधी ताव मारतो आहे, असं आम्हाला होऊन जायचं. आजही सगळीकडे आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भेळभत्ता. तो खाताना जेवणाला सुट्टी मिळाली तरी चालेल, पण भेळभत्ता संपवायचाच असा निर्धार करत तो अजूनही फस्त केला जातो. त्यातही तो नाशिककर असेल तर विचारायलाच नको. नाशिककरांना भेळभत्त्याचं नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. कुरमुरे, त्यावर भरपूर चिवडा, बारीक शेव, डाळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, खारी बुंदी यांचं मिश्रण म्हणजे भेळभत्ता. त्याबरोबर मस्त तळलेल्या मिरच्याही असतात त्यामुळे भेळभत्ता जरा झणझणीतच होतो’. भेळीचं अगदी साग्रसंगीत वर्णन तो करतो. ‘भेळीसाठी वापरण्यात येणारे कुरमुरे नाशिकमध्ये हाताने बनवलेले असतात. त्यासाठी कुठल्याही मशीनचा वापर केला जात नाही. आणि ते घोटीहून विशेष ऑर्डर देऊन मागविण्यात येतात. दिसायला थोडे काळसर परंतु खाण्यासाठी हे कुरमुरे गोड लागतात. भेळीच्या शेवटच्या घासापर्यंत याची चव तशीच राहते. एखादा नावाजलेला व्यावसायिक नसेलही, परंतु त्याच्याकडे भत्त्यासाठी आजही गर्दी होताना दिसते. शहरापासून काही किलोमीटर अंतरावर भेळचे दुकान असेल तरीही खवय्ये मंडळी आवर्जून त्या ठिकाणाला भेट देतात. नाशिकमध्ये भेळभत्ता बनवणाऱ्या अनेक पिढय़ा तयार झाल्या. त्यातही मला सानप बंधूंचा भेळभत्ता प्रचंड आवडतो’ असं अभिषेक सांगतो.    

हेही वाचा >>> फुडी आत्मा: जिवाची मज्जा!

एकूणच भेळभत्ता हा चटपटीत खाद्यप्रकार नाशिकमधल्या कुटुंबातील सर्वांचाच आवडता प्रकार आहे, हे अभिषेकच्या बोलण्यातून प्रकर्षांने जाणवतं. थोडीशी पेटपूजा जेव्हा करायची असते तेव्हा हटकून भेळेची आठवण होते यात शंका नाही. भेळभत्त्याचं ब्रँडिंग व्हावं व राज्यभर त्याची विक्री करता यावी, यासाठी सरकारी मदतीने भेळभत्त्याचं क्लस्टरदेखील बनवण्यात आलं आहे. नाशिकजवळ चांदवड येथे २०१९ पासून १३१ पेक्षा अधिक भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून रेणुका भेळभत्ता क्लस्टर कंपनीची स्थापना करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी भेळभत्ता प्रसिद्ध आहे; पण उर्वरित महाराष्ट्रात भत्ता हा प्रकार फारसा माहिती नाही. त्यामुळे त्याचं आधुनिक पद्धतीने पॅकेजिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचतं. नव्या तंत्रज्ञानाचं ज्ञान, आधुनिक पॅकेजिंग मशिनरी, स्टीकर यांसारख्या सामूहिक गोष्टींमुळे छोटय़ा उद्योगांना चालना मिळण्यासाठी हे क्लस्टर महत्त्वाचं ठरलं आहे, असं तो म्हणतो.     

‘मिसळ’ हा मराठी खाद्यसंस्कृतीतील असा एक पदार्थ आहे; जो प्रदेशानुसार आपली चव आणि रूप बदलतो. सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आणि कुणालाही खायला आवडणारा पदार्थ म्हणूनही तो अलीकडे नावारूपाला आलाय, पण मिसळ हा केवळ पदार्थ नसून त्या प्रदेशातील खवय्यांसाठी त्यांचा अभिमान असतो. नाशिकच्या झणझणीत आणि तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही वेगळाच असतो. त्याविषयी अभिषेक सांगतो, ‘आम्ही नाशिककर मित्र सकाळी दहाच्या आत पहिल्या घाण्याची मिसळ खायला जातो. एका भल्या मोठयम वाडग्यात लालबुंद रश्शाचा तवंग मिरवणारी खमंग र्ती, ऐसपैस ‘ट्रे’च्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे चटपटीत मिश्रण, पापड, लिंबू, कांदा, मिरची आणि खास मिसळस्नेही पावाची लुसलुशीत लादी असा चवदार जामानिमा असलेली नाशिकची मिसळ हा कोणत्याही सुग्रास भोजनाएवढाच ऐटदार थाट असतो. त्यामुळे नाशिकला येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची वा प्रवाश्याची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळीलाच असते. उत्तर-दक्षिणेकडील नाश्त्याच्या पदार्थानी महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत केलेला शिरकाव रोखण्याची ताकद असलेली मिसळ न चाखलेला माणूस महाराष्ट्रात आढळणार नाही हे खरं असलं तरी अजूनही पंचतारांकित खाद्य परंपरेने मात्र मिसळीला दोन हात दूरच ठेवलं आहे’.        

हेही वाचा >>> फुडी आत्मा: सारं काही खाण्यासाठी..

अभिषेक त्याच्या मिसळीबद्दलच्या आठवणी सांगतो. ‘मी लहानपणापासून माझ्या शाळेच्या जवळची बाळासाहेबची मिसळ खातोय. माझ्या लहानपणी पॉकेटमनी ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे जवळ पैसे काही नसायचे, पण मिसळीची हौस खूप असायची. तेव्हा हे बाळासाहेब मिसळवाले आम्हा शाळकरी मुलांना एका पावात मिसळ घालून फक्त ५० पैशात द्यायचे. त्यांचा नियम होता की शाळेचा गणवेश घातलेल्याच मुलांना मिसळ मिळणार. त्यामुळे त्या जागेशी व मिसळीशी खूप भावनिक आठवणी आहेत’ असं तो सांगतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बुधा जिलेबीलाही अभिषेकची मोठी पसंती आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘नाशिकमध्ये जिलेबी म्हटलं की बुधा हलवाई हे आमचं हक्काचं ठिकाण. इथली जिलेबी फक्त पाहिली तरी तोंडाला पाणी सुटतं. इतकंच नाही तर एकदा खाल्ली की, चव कायमची लक्षात राहतेच राहते. बुधाजी वाघ यांनी १९५६ साली या बुधा हलवाई जिलेबी दुकानाची स्थापना केली. आजतागायत हे ठिकाण फक्त जिलेबीमुळे खवय्यांसाठीचं आकर्षण आहे. एका मोठय़ा पसरट, लोखंडी कढईत गरम तुपात सोनेरीसर, केशरी रंगावर तळलेले, वाटोळय़ा जिलब्यांचे घाणेच्या घाणे पाकात टाकले जात असतात. बघणाऱ्यांच्या पंचेद्रियांना आव्हान देणारं असं हे दृश्य असतं आणि यानंतरचा खाद्यानुभव हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा भाग असतो. दररोज शेकडो ग्राहक या दुकानात येत असतात. सण-उत्सव काळात तर या दुकानात पाय ठेवायलादेखील जागा नसते. नाशिकला पैलवानांची मोठी परंपरा आहे. हिवाळय़ात जिलेबी आणि दुधाचा खुराक घेणारे अनेक पैलवान नाशिकमध्ये आहेत. ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर हेही इथे येत असत. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला  तर इथे स्पेशल उपवासाची जिलेबी मिळते. उपवासाची जिलेबी ही बटाटय़ांपासून बनवलेली असते’ अशा आठवणीही त्याने सांगितल्या.       

माझ्यासाठी खाणं म्हणजे मूड चेंजर आहे असं सांगत अभिषेक पुढे म्हणाला, ‘जिवाभावाच्या माणसांपासून लांब करिअर करण्याच्या निमित्ताने जेव्हा मुंबईत येऊन राहिलो तेव्हा इथे माझं असं कोणीच नव्हतं. सोसायटीतल्या बंद खोल्या भीतीदायक वाटायच्या. मनातल्या भावना शेअर करायला कोणी नव्हतं. ऑडिशनला जायचो आणि तिथून रिजेक्ट झालो तर खूप स्ट्रेस यायचा, तेव्हा मी गोरेगावला स्ट्रीट फूड खायचो. खिशात जास्त पैसे नसायचे, हॉटेलिंग करायला काही परवडायचं नाही. अशा वेळी खाण्यामुळे माझा मूड एकदम चेंज व्हायचा. ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो तर स्वत:च स्वत:ला एक मॅकडॉनल्ड्सची ट्रीट द्यायचो. त्यामुळे आनंद द्विगुणित व्हायचा. माझ्या करिअरच्या प्रारंभीच्या काळात माझा सच्चा साथी म्हणजे खाणं होय. खाणं केवळ माझ्या पोटालाच नाही तर माझ्या मनालाही आधार देतं’. केवळ भूक भागवण्यासाठी खाणारे मला अरसिक वाटतात, असं तो विशेष नमूद करतो.

पोट आणि मेंदू ही दोन महत्त्वाची ‘ऊर्जानिर्मिती केंद्रं’ आहेत. त्यामुळे कायम रुचकर अन्नाला सोबती मानून यशाच्या पायऱ्या चढा. जसं अन्न तसं मन आणि जसं मन तशी आपली वागणूक आणि जशी आपली वागणूक (कर्म) ते आपल्या आयुष्याचं फलित. एकदम सोप्पं समीकरण आहे. म्हणूनच जर आयुष्यात ‘खऱ्या अर्थाने’ यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अन्नाचा विचार करा, असं तो सांगतो.

viva@expressindia.com