दीपक मंडळाचा उपक्रम
दशकापासून शहरातील नाटय़ चळवळ जागृत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या येथील दीपक मंडळाचा सांस्कृतिक विभाग १२ डिसेंबर रोजी जुळून येणारा १२:१२:१२ या योग साधत रंगभूमीवरील एका विक्रमासाठी सज्ज झाला आहे. या दिवशी दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत म्हणजेच १२ तासात १२ नाटय़प्रकार सादर करण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर, या नाटय़प्रकारांचे विषयही वेगवेगळे म्हणजेच १२ राहणार असून दिग्दर्शकही १२, तंत्रज्ञ १२ असणार आहेत. १२० कलाकार आणि ६० सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिवधनुष्य पेलण्यात येणार आहे.
दीपक मंडळाने सातत्याने नाटय़ चळवळीत गुंतवून घेतले आहे. सातत्याने होणाऱ्या कार्यशाळा, सुट्टीत घेतली जाणारी बालनाटय़ शिबीरे, रंगभूमीशी निगडीत मंडळींशी गप्पा, असे कार्यक्रम मंडळाने घेतले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील नाटय़कृती, एकांकिका, बालनाटय़, हिंदी व संस्कृत नाटक, यांची निर्मिती करून त्याचे प्रयोग ठाणे, पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, चाळीसगाव, लातूर, अकलूज, कणकवली या ठिकाणी सादर करण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या जीवनावरील ‘शके १८३१’ सारखी कलाकृती हुतात्म्यांना मानवंदना देणारी ठरली. शौर्य शताब्दी निमित्त या नाटकाचे प्रयोग नाशिकमधील विजयानंद थिएटरसह टाणे कारागृहातही झाले.
१२ डिसेंबर रोजी आयोजित उपक्रमही आगळावेगळा आहे. एकावेळी एकाच रंगमंचावर सातत्याने १२ तास विविध नाटय़ प्रकारांचा आविष्कार अपवादानेच याआधी झाला असेल. नाशिकमध्ये अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या प्रयोगाची सुरूवात दुपारी १२ वाजता संदीप आपटे यांच्या ‘संगीत कालाय तस्मै नम:’ (दिग्दर्शक सई आपटे) या एकांकिकेने होणार आहे.
यानंतर होणाऱ्या नाटय़ प्रकारांमध्ये ‘वनराई’ हे विशेषनाटय़. लेखक व दिग्दर्शक शिला सामंत, ‘संत सूरदास’ हे नृत्यनाटय़. लेखक निशिगंधा घाणेकर. दिग्दर्शक अबोली पंचाक्षरी, किरण कुलकर्णी यांचा एकपात्री प्रयोग, ‘छूम छूम खडा’ हे बालनाटय़. लेखक राधिका राजपाठक. दिग्दर्शक मनिषा एकबोटे, संस्कृत एकांकिका ‘प्रतिमा भास:’ रूपांतर अश्लेषा कुलकर्णी. दिग्दर्शक रूपाली झोडगेकर, आविष्कारमध्ये गिरीश जुन्नरे लिखीत ‘जर्नी ऑफ सक्सेस’ दिग्दर्शक शौनक गायधनी, गिरीश जुन्नरे यांचाच ‘चामखीळ’ हा दिर्घाक. दिग्दर्शक स्वरूप बागूल, अभय सदावर्ते लिखीत ‘जननी जन्म भूमिश्च:’ हे छायानाटय़. दिग्दर्शक अमित शिंगणे, लेखक व दिग्दर्शक शुभांगी पाठक यांचे ‘द पाथ’ हे मूकनाटय़, नुपूर सावजी दिग्दर्शित व गौरजा महामिने लिखीत ‘पाणी वाचवा’ हे पथनाटय़ आणि त्यानंतर सुरेश गायधनी दिग्दर्शित व अभय सदावर्ते लिखीत ‘रात्र काळी घागर काळी’ या नाटकाने या विक्रमाचा समारोप होईल.
नाशिककर रसिकांनी या प्रयोगांना प्रतिसाद देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश गायधनी, सचिव विजय शिंगणे, सर्व दिग्दर्शक, लेखक यांनी केले आहे.