उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि नंदुरबार यात कमालीचा फरक. भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच दृष्टिकोनातून मागासलेल्या या आदिवासीबहुल परिसरात अंधश्रद्धा, स्थानिक प्रथा व परंपरांचा मोठा पगडा राहिल्याने ‘डाकीण’सारख्या अनिष्ट प्रथा वर्षांनुवर्षे ठाण मांडून राहिल्या. महिलांना जगण्याचा हक्क नाकारणारी ही प्रथा नष्ट करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने पुढाकार घेतल्यानंतर तंटामुक्त समित्यांनी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले. त्याअंतर्गत खास डाकीण प्रथा निर्मूलन समित्यांची स्थापना करण्यात आली. या प्रयत्नांची फलनिष्पत्ती एकूण १६२ गावांनी आपले गाव डाकीण प्रथेतून मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र पोलीस दलाकडे सादर करण्यात झाली आहे.
स्थानिक पातळीवरील तंटे स्थानिक पातळीवरच सामोपचाराने मिटविणे आणि भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून दक्षता घेण्याच्या उद्देशाने मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील १०० टक्के गावांनी सहभाग नोंदविला आहे. या जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, तळोदा या सहा तालुक्यांचा समावेश असला तरी डाकीण ठरविण्याच्या सर्वाधिक घटना प्रामुख्याने धडगाव व तळोदा तालुक्यात घडल्याची उदाहरणे आहेत. वास्तविक गावाचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर शांतता असणे आवश्यक आहे. तंटे मिटविण्याचा तो मुख्य हेतू असला तरी सहभागी झालेल्या प्रत्येक गावाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे परीक्षणही शासनामार्फत गाव तंटामुक्त ठरविताना केले जाते. या उपाययोजनेंतर्गत गावातील अनिष्ट प्रथा रोखण्याच्या मुद्याचाही अंतर्भाव आहे. ही बाब लक्षात घेऊन डाकीण प्रथा नष्ट करण्यासाठी स्थानिक पातळीवर एक सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज होती. पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी या भयावह प्रथेचे स्वरूप लक्षात घेऊन प्रथम ज्या भागात अशा अंधश्रद्धेचे प्रमाण अधिक आहे, त्याकडे लक्ष केंद्रित केले. अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, मोलगी, म्हसावद या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बहुतेक गावे त्यात समाविष्ट होती. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बाधीत गावांचे दौरे करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली. गावातील सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, महिला बचत गटाच्या सदस्य, शिक्षक व शिक्षिका अशा सर्व घटकांच्या बैठका घेऊन ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा पहिला टप्पा पार पाडल्यानंतर १६२ गावांमध्ये डाकीण प्रथा निर्मूलन समित्यांची स्थापना करण्यात आली. गावातील अनिष्ट प्रथा, चालीरिती रोखणे आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम हा निकष गाव तंटामुक्त ठरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. या समित्यांची स्थापना झाल्यावर या विषयावरील जनजागृतीने वेग पकडला. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता गावकरी बरेच काही साध्य करू शकतात, ही जाणीव करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. पीडित गावात केवळ या कामासाठी स्वतंत्रपणे समिती अस्तित्वात असल्याने महिलांना दिलासा मिळाला. कारण, याआधी असाहाय्य ठरणाऱ्या महिलांना स्थानिक पातळीवर कोणताही आधार नव्हता. समित्यांमुळे अशा घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे दृष्टिपथास आले. डाकीण ठरविलेल्या महिलांचे पुनर्वसन करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि गावकऱ्यांचे प्रबोधन करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याची संकल्पना डॉ. अपरांती यांनी मांडली. तंटामुक्त समिती, डाकीण प्रथा निर्मूलन समिती व पोलीस यंत्रणा या विषयावर काम करू लागल्याने वातावरणात बदल झाले. कोणत्याही गावात अशी एखादी घटना घडल्याची माहिती मिळाल्यास पोलीस यंत्रणाही तत्परतेने दखल घेऊ लागली. मुळात कोणत्याही गावात सगळे गावकरी काही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे नसतात. काही मोजके घटक असे उद्योग करत असल्याने त्यांच्यावर कारवाईद्वारे वचक निर्माण करणे शक्य झाले. आजमितीस १६२ गावांनी आपले गाव डाकीणमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र पोलीस यंत्रणेला सादर केले आहे. डाकीण प्रथेच्या विरोधात पोलिसांनी राबविलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे हे फलित होय.
     ल्ल अनिकेत साठे
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील सहावा लेख.