पाच वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणा-यांच्या तब्बल ७२ जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचा-यांच्या आज मुख्यालयातच, परंतु अन्य विभागांत बदल्या (स्थानांतर) करण्यात आल्या. याचबरोबर एकाच टेबलवर तीन वर्षांहून अधिक काळ काम करणा-यां कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.
मुख्यालयात सामान्य प्रशासन व लेखा विभागाचे कर्मचारी विविध विभागांत नियुक्त असतात. ग्रामविकास विभागाने अलीकडेच आदेश देऊन एकाच विभागात पाच वर्षांहून अधिक काळ काम करणा-यांच्या तसेच तीन वर्षे एकाच टेबलवर काम करणा-यां कर्मचा-यांच्या बदल्या (स्थानांतर) करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही आज करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने कर्मचा-यांंचे स्थानांतर करण्यात आले. आज १ कक्ष अधिकारी, ५ अधीक्षक, १८ वरिष्ठ सहायक व ४८ कनिष्ठ सहायक अशा एकूण ७२ कर्मचा-यांच्या मुख्यालयातच, परंतु अन्य विभागांत बदल्या करण्यात आल्या. लवकरच आता लेखा विभागातील कर्मचा-यांच्या अशाच पद्धतीने स्थानांतर करण्यात येणार आहे. पंचायत समिती पातळीवरही गटविकास अधिका-यांंना असे स्थानांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.