छोटय़ा शहरांतून नशीब आजमावण्यासाठी दोन मित्र मुंबईत येतात. सुरुवातीला नाटके लिहून-दिग्दर्शित करून नाव कमावतात. पुढे हे दोघेही नावारूपाला येतात. चित्रपटसृष्टीत आपल्या अनोख्या प्रतिभेने स्थिरावतात. मग त्यांना पुन्हा एकदा आपले पहिले प्रेम, अर्थात नाटक, खुणावू लागते. तब्बल दहा वर्षांनी हे दोघे एकत्र येत एक नाटक रंगभूमीवर घेऊन येतात.. हे कोणत्याही चित्रपटाचे कथानक नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडत असलेली घटना आहे. हे दोन मित्र म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी आणि दहा वर्षांच्या विरामानंतर रंगभूमीवर येणारे त्यांचे नाटक म्हणजे ‘गेट वेल सून’!
गेल्या अनेक वर्षांपासून नाटक लिहिण्याची इच्छा होती. मी आणि चंद्रकांत कुलकर्णीने २००४ मध्ये ‘सेलिब्रेशन’ हे नाटक केले होते. त्यानंतर आम्ही चित्रपटांकडे वळलो. ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’ आणि आता नव्याने येत असलेला एक चित्रपट असे तीन चित्रपट एकत्र केल्यानंतर आता आम्हाला पुन्हा एकदा रंगभूमी खुणावू लागली आहे, असे प्रशांत दळवी यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. या नाटकात स्वप्निल जोशी, संदीप मेहता आदी कलाकारही काम करत आहेत. विशेष म्हणजे श्रीकृष्ण या मालिकेत छोटय़ा कृष्णाची भूमिका साकारणारा स्वप्निल आणि त्याच मालिकेत नारदाची भूमिका साकारणारे संदीप मेहता अनेक दिवसांनी एकत्र काम करत आहेत.
या नाटकाची संकल्पना डॉ. आनंद नाडकर्णी यांची आहे. आपल्या आजूबाजूला सध्या अनेक आमिषे आहेत. मोहात टाकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मात्र त्यातून आपला मार्ग कसा आणि कोणता निवडावा, हे आव्हान आज सर्वासमोरच आहे. तरीही आपण अनेक गोष्टींच्या आधीन होत जातो. या आधीन होण्याच्या प्रक्रियेवरच हे नाटक असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर हे निर्माते या नाटकाचे उच्च निर्मितीमूल्य जपणार आहेत.