कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने गांधी जयंतीपासून तोटय़ामध्ये धावणाऱ्या मार्गावरील सात बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक आपल्या भागात येणारी बस बंद झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिवहन अधिकाऱ्यांनी या बस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. बस संख्या वाढली की त्या पुन्हा सुरू करण्यात येतील असे सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानक ते गोग्रासवाडी बस धावत होती. या बसमुळे प्रवाशांना रिक्षाच्या मागे धावण्याचा व्यायाम करावा लागत नव्हता. डोंबिवली स्थानक, मानपाडा, संत नामदेव पथ, शिवाजी उद्योगनगर ते आगारापर्यंत ही बस नियमित धावत होती. ही बस अचानक गुरुवारी बंद करण्यात आली. प्रवाशांनी बाजी प्रभू चौकातील केडीएमटीच्या कार्यालयात चौकशी केली, त्यावेळी ही बस तोटय़ात होती. फक्त सहाशे रुपये उत्पन्न मिळत होते. त्यामुळे बंद करण्यात येत असल्याचे सांगितले.
परिवहन अधिकाऱ्याने सांगितले, दररोज विविध मार्गावर परिवहन प्रशासनाच्या ९० बसचे नियोजन होते. १५ बस विविध दुरुस्त्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे ८० बसचे दररोजचे नियमन करणे अवघड झाल्याने तोटय़ाचे सहा ते सात मार्ग बंद करून त्या मार्गावरील बस उत्पन्न देणाऱ्या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ बस दुरुस्ती करून उपलब्ध झाल्या की बंद केलेल्या मार्गावरील बस पुन्हा सुरू करण्यात येतील, असे अधिकारी म्हणाला.
गांधी जयंतीच्या दिवशी चांगल्या उपक्रमांची सुरुवात केली जाते. कल्याण डोंबिवली पालिकेने मात्र बस बंद करून करदात्या नागरिकांना कोलदांडा दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनावर सध्या कोणाचा अंकुश नसल्याने पालिकेच्या एकूण कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.