विदर्भातील एक केंद्रीय मंत्री, दोन माजी मंत्री, चार मावळते खासदार, एक माजी खासदार, राज्याचे दोन मंत्री, तीन आमदार आणि एक माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या राजकीय भाग्याचा फैसला उद्या, शुक्रवारी होणार आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि मतदारांच्या उत्साहामुळे उमेदवारांची उत्कंठा मात्र आता शिगेला पोहोचली आहे.
जनमत चाचणीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता असली तरी केंद्रात सत्तेसाठी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या पक्षांनी संपूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे. आता त्याचे फळ कोणाला चाखायला मिळते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात विदर्भातील सर्व दहाही जागांवर १० एप्रिलला मतदान झाले. यात माजी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, माजी सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, मावळते खासदार भावना गवळी, आनंदराव अडसुळ, संजय धोत्रे, प्रतापराव जाधव, प्रकाश आंबेडकर व अमदार नाना पटोले, सागर मेघे, अशोक नेते यांच्यासह २०१ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे. उद्या, शुक्रवारी देशभरात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सर्व मतदारसंघात साधारणत २२ पेक्षा अधिख फे ऱ्या होण्याची शक्यता आहे. सर्वत्र गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे मतमोजणीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेतली जाणार आहे. देशात सर्वत्र नरेंद्र मोदींच्या असलेल्या लाटेमुळे भाजपाला अनुकुल असलेले वातावरण, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारच्या महागाई आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेली जनता यामुळे नेमका याचा भाजपला होईल की काँग्रेसला, हे सांगणे कठीण आहे.
निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपानंतर नेमका कुठल्या पक्ष बाजी मारतो, हे कळणार आहे. शिवाय, वाढलेली मतदारांची संख्या, मतदानाची टक्केवारी आणि मतदारांचा उत्साह यामुळे कोणत्या मतदार संघात कोण बाजी मारेल, याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. निवडणुकीनंतर थंडावलेल्या राजकीय वातावरणात उमेदवार व त्यांचे समर्थक सक्रीय झाले आहेत. काही देवाला साकडे घालून प्रार्थना करीत आहे, तर काहींनी मंदिरात पूजापाठ केला आहे. मतमोजणीला जाणाऱ्या प्रतिनिधींना पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. विविध वाहिन्यांनी केलेल्या जनमत चाचणीनुसार भाजपप्रणित लोकशाही आघाडी बहुमत मिळणार असल्याचे दाखविले जात असल्यामुळे पक्षाच्या कार्यकत्यार्ंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांंनी जल्लोशाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शहरातील विविध भागात होर्डिग लावले जात आहेत. नागपुरात नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, रामटेकमध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि सेनेचे कृपाल तुमाने, वध्र्यामध्ये काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस, तर गोंदिया-भंडाऱ्याच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपाचे नाना पटोले यांच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीत प्रथमच गडकरी यांच्या रूपाने कमळ फुलणार असल्यामुळे कार्यकर्त्यांंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाचे हंसराज अहीर, काँग्रेसचे संजय देवतळे आणि आम आदमी पक्षाचे वामनराव चटप, अशी तिरंगी तिरंगी हेवीवेट लढाई आहे. यवतमाळमध्ये मावळत्या खासदार भावना गवळी आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांची लढत असली तरी मनसेचे राजू पाटील किती मते घेतात, यावर गवळी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात, तालुक्यात, गल्लीबोळात, पानटपऱ्या आणि विविध चौकाचौकात कोण निवडून येणार, याची चर्चा सुरू असून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली, हे मात्र तितकेच खरे.

दुपारी ४ पर्यंत निकाल
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी देशभरातील ९८९ केंद्रावर शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजेपासूनच बोलावण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता कर्मचारी आपापल्या टेबलवर उपस्थित राहतील. ८ वाजले की मतमोजणीला सुरुवात होईल. निकालाचे कल सकाळी ११ वाजेपासून येण्यास सुरुवात होईल. तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. सामान्य नागरिकांमध्ये निकालाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.