बहीण-भावाच्या नात्यामधील स्नेह आणि प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून दूरदेशी, परदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या भावांना वेळेत राखी पोहचविण्यासाठी तमाम भगिनींची धडपड सुरू आहे. रक्षाबंधनापूर्वी भावाच्या हाती राखी पडण्याचा खात्रीशीर उपाय म्हणून हल्ली टपाल खात्यापेक्षा कुरिअर सेवेवर जास्त विश्वास ठेवला जात आहे. राखीपौर्णिमेच्या सणाची ही निकड लक्षात घेऊन कुरिअर कंपन्यांनीही आपल्या दराची दोरी ताणली असून खास राखीसाठी एरवीपेक्षा दुप्पट अथवा तिप्पट दर आकारले आहेत. त्यामुळे दहा-पंधरा रुपयांची राखी पाठविण्यासाठी आता दीडशे, दोनशे तर परदेशी पाठविण्यासाठी तर चक्क हजार रुपये मोजावे लागत आहेत.  कुरिअर कंपन्यांचे कामही राखीपौर्णिमेच्या निमित्ताने ४० टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले आहे. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने बहिणीने भावाच्या घरी जाऊन त्याला राखी बांधणे अपेक्षित असले तरी सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वानाच ते शक्य होत नाही. अनेकांचे भाऊ दूरदेशी अथवा परदेशात राहत असतात. त्यामुळे कुरिअरद्वारे राखी पाठविणे हाच एक पर्याय उरतो. आता सोशल मीडियामुळे टपालाद्वारे पत्र पाठविणे कालबाह्य़ झाले असले तरी राखी मात्र पारंपरिक पद्धतीने पाकिटात घालूनच पाठवावी लागते. त्यामुळे राखीपौर्णिमेच्या आधी आठ-दहा दिवस कुरिअर कंपन्यांची चंगळ असते. राखी वेळेत पोहोचण्याच्या हमी देतानाच कुरिअर कंपन्यांनी त्यांचे दर दुप्पट अथवा तिपटीने वाढवले आहेत.  एरवी विविध कुरिअर कंपन्या ८० ते १०० रुपयांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांमध्ये सेवा देतात. अगदी दुसऱ्याच दिवशी राखी पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्यांनी खास एक्स्प्रेस सेवा सुरू केली असून त्यासाठी दुप्पट म्हणजे २०० ते २५० रुपये आकारले जात आहेत.  दुबईमध्ये ४८ तासांत राखी पाठवण्यासाठी काही कंपन्या ४५० ते ५०० रुपये आकारतात तर अमेरिका आणि युरोपमध्ये तीन ते चार दिवसांत हमखास राखी पोहोचविण्यासाठी कुरिअर कंपन्या ९५० ते १००० रुपये आकारतात. मात्र भावाचे प्रेम पैशात तोलता येत नसल्याने १५ रुपयांच्या राखीसाठी महिला आनंदाने कैकपट अधिक रक्कम आनंदाने मोजत आहेत. 

‘रक्षाबंधन’ आमच्यासाठी विशेष..
रक्षाबंधन सणाला आमच्या व्यवसायात अधिक महत्त्व असून त्यासाठी या काळात आम्ही आधिक जलद सेवा देतो. केवळ व्यवसाय नव्हे तर भावना समजून सेवा द्या, असे आदेश आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले जातात. या काळात वाढलेले काम ४० टक्क्यांहून अधिक असून त्यासाठी आधिकचे मनुष्यबळही मागवावे लागते. राखी रक्षाबंधनापूर्वी पोहचल्यास तिला महत्त्व असते. त्यामुळे राखीचे कुरिअर ओळखता यावे यासाठी वेगळे पॅकिंग केले जात असून ते अधिक लवकर पोहोचावे असा आमचा कटाक्ष असतो. राखीबरोबर, भेटवस्तू आणि मिठाईसुद्धा काही बहिणी कुरिअर करतात. रक्षाबंधन यंदा रविवारी असल्याने रविवारीसुद्धा आमचे कार्यालय खुले राहणार असून त्या दिवशीच राख्यांचे कुरिअर पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. परदेशामध्येसुद्धा आम्ही जलद सेवा देतो अशी माहिती ठाण्यातील डीटीडीसी कुरिअरचे प्रसन्न जोशी यांनी दिली.