श्रद्धांजली सभेत आठवणींना उजाळा
घटनेची शास्त्राच्या कसोटीवर मीमांसा करणे, विवेकवाद जागवणे आणि नवसमाज निर्मितीस चालना देण्याचा प्रयत्न डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा अध्यक्ष संजय शेंडे यांनी केले. सेवादल शिक्षण संस्था आणि समितीच्या नागपूर शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दाभोलकरांच्या कार्यकतृत्वाचा आढावा घेताना संजय शेंडे म्हणाले, जी गोष्ट नाही ती मानणे म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा दूर करून कार्यकारणभाव जाणणाऱ्या प्रत्येक घटनेची शास्त्राच्या कसोटीवर मीमांसा करणाऱ्या, विवेकवाद जागवणाऱ्या, नवसमाज निर्मितीसाठीचा प्रयत्न डॉ. दाभोलकर करीत होते. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकातील ज्या गोष्टीचे अस्तित्व नाही. त्या खुळचट गोष्टी जादूटोणा, चमत्कार, मंत्रतंत्र, जारण-मारण, भूत अशा भ्रामक कल्पनांमुळे समाजाचे शोषण होते, अत्याचार होतात, हे दाभोलकर पटवून द्यायचे. अंधश्रद्धेच्या नावावरचे अपराध थांबावेत, त्याविरुद्ध त्यांचा लढा होता. ‘युवती एल्गार’ या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थिनींना प्रशिक्षित करून समाज जागृतीसाठी एक नवी उभारणी करण्याची उर्मी अनेक विद्यार्थिनींच्या मन:पटलावर त्यांनी बिंबविली, असे शेंडे म्हणाले.
वध्र्याचे गजेंद्र सुरकार यांनी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून अनेक घटनांचा यावेळी ऊहापोह केला. अकोल्यात डॉ. दाभोलकरांवर हल्ला झाला होता. त्यावेळी श्रीराम लागू त्यांच्या बरोबर होते. विरोधी विचारांचा संघर्ष अहिंसेच्या पातळीवर विचारांनीच करण्याचे व्रत दाभोलकरांनी शेवटपर्यंत पाळले. धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद असा प्रवास डॉ. दाभोलकरांनी केल्याचे सुरकार म्हणाले. नागेश चौधरी यांनी डॉ. दाभोलकरांच्या चळवळीचे प्रेरणास्थान नागपूर असल्याचा उल्लेख करून दाभोलकर आणि डॉ. बाबा आढाव यांच्या चळवळीतील योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
अंनिसचे राज्य उपाध्यक्ष विजय सालंकर, मधुकर वाघमारे, विजय बाभुरकर, जिंदा भगत, राजेंद्र गंगोत्री आणि एन.एल. सावरकर तसेच सेवादल महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी पायल काळबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. समितीच्या नागपूर शाखेचे कार्याध्यक्ष श्रीखंडे यांनी दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व, चळवळीतील योगदान आणि एक वैचारिक नवी दिशा यावर भाषणात भर दिला.
श्रद्धांजली सभेला अनेक जिल्ह्य़ातून समितीचे प्रतिनिधी आले होते. मौद्याहून गौरव अळणे, श्याम निकोसे, विनोद उलीपवार, शशिकांत वाकोडे, नाना आगाशे, राजेंद्र पिट्रोडा, अॅड. एस. इंगळे, काशीनाथ बोरकर आणि डॉ. आनंद ढोबळे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक केशवराव शेंडे यांनी दाभोलकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा आणि समाजातील अनिष्ठ प्रथा-परंपरांना आळा घालण्याचे आवाहन केले. माजी प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
नवसमाजनिर्मितीचे काम नरेंद्र दाभोलकरांनी केले
श्रद्धांजली सभेत आठवणींना उजाळा घटनेची शास्त्राच्या कसोटीवर मीमांसा करणे, विवेकवाद जागवणे आणि नवसमाज निर्मितीस चालना देण्याचा प्रयत्न डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र
First published on: 30-08-2013 at 09:19 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar had done the great work in social care