शेतसाऱ्यामध्ये सवलत, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या अतिरिक्त सवलतीसह अंतिम पैसेवारीनंतर राज्य सरकारने दुष्काळ अधिकृतपणे जाहीर केला. मराठवाडय़ाच्या ५ जिल्ह्य़ांतील ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारीच्या २ हजार ६१४ गावांमध्ये यासह दुष्काळाच्या सवलती लागू होणार आहे. याशिवाय छावणीतील जनावरांच्या खाद्यात ३ दिवस पेंड द्यावी, तसेच छावण्यांची देयके देताना त्यातून शेणाची रक्कम वजा करू नये, असेही नव्याने कळविले आहे.
सन २०१२ च्या खरीप हंगामात जिल्हाधिकाऱ्यांनी ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या ७ हजार ६४ गावांमध्ये टंचाई स्थिती जाहीर करण्यास शासन मंजुरी दिली. पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेली औरंगाबाद विभागातील गावे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद – १ हजार १७६, जालना ९७०, परभणी ३०, बीड ६८५ व उस्मानाबाद ४३८. पन्नासपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांतील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांची चालू वीजदेयके ३३ टक्के ग्रामपंचायतीने भरण्याच्या अटीस अधीन राहून ६७ टक्के (१७ टक्के मदत व पुनर्वसन व ५० टक्के पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल खर्चातून) भरण्यात येतील. या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावयाचा असून, त्यासाठी आवश्यक निधी संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.