पेंच व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती येत्या १९ एप्रिलला नागपुरात येत आहे. या समितीतील सदस्य दोन दिवस पेंच व्याघ्र प्रकल्प तर दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा करतील. यादरम्यान व्यवस्थापन आराखडय़ातील उद्देशपूर्तीसाठी केलेल्या कामाचा किती व कसा प्रभाव झाला याची पाहणी ते करणार आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये या समितीने व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन केले होते.
संपूर्ण भारतातील व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची मूल्यांकन समिती गठीत करण्यात आली आहे. भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांचे सुमारे पाच ते सात गटात विभागणी करण्यात आली आहे. त्या प्रत्येक गटासाठी एक मूल्यांकन समिती गठीत करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पातील सद्यस्थितीची पाहणी हे सदस्य करतील. व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आराखडय़ामध्ये जी कामे नेमून देण्यात आली आहे, त्याचा वन्यप्राण्यांवर काय परिणाम झाला, वन्यप्राण्यांसाठी असलेली योजना किती प्रभावीपणे राबवल्या गेली, यामध्ये वन्यप्राण्यांचा अधिवास, पाण्याची उपलब्धता, निसर्ग पर्यटन, व्याघ्र प्रकल्पामधील गावांचे पुनर्वसन आदी कामांचा समावेश आहे.
ही मूल्यांकन समिती येत्या २० व २१ एप्रिलला पेंच व्याघ्र प्रकल्पात आणि २३ व २४ एप्रिलला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण (एनटीसीए) तर्फे आंध्र प्रदेशातील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विजयकुमार सिथला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य व्ही.के. पुनियाल, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नसीम अहमद अन्सारी, जागतिक वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ)चे प्रतिनिधी दीपांकर घोष यांचा समावेश आहे. या चमूसोबत अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान सेवेचे संचालक डेव्हिड मान्स्की हेसुद्धा असणार आहेत.