‘अब की बार मोदी सरकार’ची घोषणा सफल होऊन केंद्रात भाजपा नेतृत्वातील नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झाल्याने ‘अच्छे दिन आयेंगे’ची आशा करीत बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र धान्याचे भाव पडल्याने ‘कहॉ है अच्छे दिन’ असा प्रश्न पडला आहे.
राज्यात विदर्भातील २२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अलीकडेच सहकार खात्याने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यवतमाळातही बाजार समितीवर डॉ.सूर्यकांत गाडे पाटील अध्यक्ष असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन प्रशासकांनी कारभार हाती घेतला आहे, पण तेव्हापासून बाजार समितीत धान्याची आवक कमी झाली आहे. विशेषत लोकसभा निवडणुकीपूर्वी कापूस, सोयाबीन, चना, इत्यादी धान्याचे भाव वाढले होते ते आता मात्र मोदी सरकार केंद्रात सत्तारूढ होताच धाडकन कोसळले आहेत. निवडणुकीपूर्वी कापसाचा भाव ५३०० रुपये िक्वटल होता. तो ७०० रुपयांनी कमी होऊन ४५००-४६०० रुपये झाला आहे. सोयाबीनचे भाव ३८०० होते ते आता ३४५० रुपयांवर आले आहेत. चना ३१०० वरून २६०० रुपये िक्वटलवर घसरला आहे. मुंगफल्ली ३८०० वरून ३४०० वर आली आहे. ३४००रुपये आली आहे. गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सारे पीक उध्वस्त झाले होते आणि तशातच अच्छे दिन आयेंगेच्या आशेने शेतकऱ्यांनी सुध्दा मोदी सरकारला केंद्रात सत्तारूढ केले. मात्र, आता प्रत्यक्षात कहॉ है अच्छे दिन, कब आयेंगे अच्छे दिन, असा सवाल डोळ्यात आसवे आणून शेतकरी विचारत आहेत.