िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जवळपास २५०० कोटी खर्च करून राबवण्यात येणाऱ्या पर्यावरण विकास आराखडय़ावरून शिवसेनेतील विसंवाद उघड झाला आहे. शहरातील रस्ते, वाहतूक, भूमिगत गटारे, अतिक्रमणे, झोपडपट्टय़ा अशा प्रश्नांचे नियोजन करून नंतरच या ‘कृत्रिम’ पर्यटननगरीचा विचार करा, अशी उपहासात्मक सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना केली आहे.
महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत पर्यावरण आराखडय़ाचे सादरीकरण मंगळवारी झाले. त्यावेळी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे व नगरसेविका सुलभा उबाळे उपस्थित होते. त्यांनी या आराखडय़ाविषयी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, धुमाळ यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे नाराजी व्यक्त करताना विरोधी सूर आळवला आहे. आराखडय़ाचे नियोजन करताना मोजक्या नगरसेवकांऐवजी सर्व नगरसेवकांना सहभागी करून घ्यावे व त्यांच्या सूचनांचा विचार करावा, असे धुमाळ यांनी म्हटले आहे. प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच घरकुल सदनिका वाटपाची घाई कशासाठी, असा मुद्दा उपस्थित करत गरिबांना खोटी आश्वासने दिली जात असून नोंदणीसाठी भरलेले त्यांचे पैसे पालिका फुकटात वापरत आहे, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. िपपळे निलख येथील उड्डाणपुलाचा खर्च दहापटीने वाढला, याला जबाबदार कोण, त्याची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी जकात रद्द करण्याचे संकेत दिले आहेत, त्याचा गंभीरपणे विचार करावा, असे धुमाळ यांनी म्हटले आहे.