गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले गौतमी गोदावरी आणि कश्यपी उपनदीवरील काश्यपी धरणांच्या किंमतीत अनुक्रमे ३२.९८ व १७.२१ कोटींनी वाढ झाल्याची बाब श्वेतपत्रिकेतून पुढे आली आहे. धरणांची अंदाजपत्रके वाढविण्याच्या क्लुप्त्यांवर याआधीच तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी बोट ठेवले होते. कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असल्याचे उदाहरण म्हणून गौतमी-गोदावरी व काश्यपी मध्यम प्रकल्पांकडे पाहता येईल. प्रकल्पांची किंमत वाढण्याची या विभागाने दिलेली कारणे जवळपास एकसमान आहेत.
पांढरे यांनी सिंचन प्रकल्पातील कामांचा दर्जा, अंदाजपत्रक वाढविण्याच्या क्लुप्त्या, उपसा सिंचन योजनांवरील अनाठायी खर्च, सिमेंटचा गैरव्यवहार अशा अनेक बाबी उघड करून जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाने श्वेतपत्रिकेत केल्याचे लक्षात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बेझे येथे तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गौतमी गोदावरी प्रकल्प आकारास येवून सांडवा दरवाजांची कामे पूर्णत्वास गेली. गंगापूर धरणावरील सिंचन क्षेत्र पुनस्र्थापित करण्यासाठी हे धरण बांधले गेले. या प्रकल्पावरील एकूण अप्रत्यक्ष सिंचन ६,८५१ हेक्टर आहे. हा प्रकल्प २०१० मध्ये सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात आला. या प्रकल्पाच्या किंमतीत लक्षणिय वाढ होण्यामागे धरणांची उंची वाढ, खोदाईचे परिमाण, सांडव्याचे संकल्पन व पाया खोदाईतील बदल, प्रकल्पग्रस्तांसाठी रस्ते व पूल अशा वाढीव बाबींचा अंतर्भाव केल्यामुळे १७.०३ कोटींची वाढ झाली. सविस्तर घटक संकल्पनामुळे ४.२४ कोटी तर प्रकल्पाचा कालावधी वाढल्याने आस्थापना खर्चात झालेली वाढ थोडी थोडकी नव्हे, तर ११.७१ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी धरणात पूर्ण जलसाठय़ाची क्षमता निर्माण झाली. या प्रकल्पांतर्गत १.२० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.
काश्यपी धरणाचे बांधकामही जवळपास दहा वर्ष चालले. धरणास कालवे नाहीत. या धरणाचे प्रयोजनही सिंचन क्षमता पुर्नस्र्थापित करण्यासाठी करण्यात आले. नोव्हेंबर २०१० मध्ये हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाकडे वर्ग करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत ७५० किलोव्ॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. जलसाठय़ातील वाढ व खोदाई क्षेत्र भूसंपादनातील अडचणी आदी व्याप्तीतील बदलामुळे सुमारे साडे सात कोटी रूपयांची वाढ झाली. घटक संकल्पनामुळे सुमारे पाच कोटी, व प्रकल्पाचा कालावधी वाढल्याने आस्थापना खर्चात झालेली वाढ जवळपास सहा कोटींची आहे. २००२-०३ मध्ये वक्रद्वाराचे काम पूर्ण झाले. २००३ पासून धरणात पूर्ण जलसाठा निर्मिती झाली आहे. या धरणाची निर्मिती गंगापूर धरणाची बिगर सिंचन वापरामुळे सिंचन क्षेत्रातील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आली. गंगापूर धरणातील पाण्याचा विनियोग मोठय़ा प्रमाणात नाशिक महापालिका, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती, नाशिक औष्णिक वीज प्रकल्पासाठी केला जातो, असेही जलसंपदा विभागाने श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. वेगवेगळी कारणे दर्शवून प्रकल्पांचे खर्च कसे उंचावले जातात, त्याचे हे प्रकल्प उदाहरण ठरू शकतील.